Thursday, August 31, 2017

पावसातील छत्र

दुपारचे ३. १५ वाजले होते. समोर हा मुसळधार पाऊस कोसळत होता. मी विक्रोळीच्या एका बस थांब्यावर मोठ्या आशेने बसची वाट पाहत उभी. मुंबईत पावसाचा हाहाकार म्हणून सर्वच ऑफिसेस ,शाळा लवकर सुटत होत्या त्या दिवशी. आमचे ऑफिस देखील त्याला अपवाद नव्हते. ३ वाजता आम्ही सर्वच बाहेर  होतो. दिवसा दुपारी देखील काळ्या कुट्ट अंधाराने आकाशाला पांघरले होते. वारा सो सो करून सैरावैरा धावत होता. आणि त्याच्या सोबत पावसाच्या या सरी आवेगाने धरणीकडे झेपावत होत्या. समोरचे सर्वच धूसर झाले होते. जिथे पाहू तिथे फक्त पाणीच पाणी. मुंबईत पावसाचा पहिला जबरदस्त फटका बसतो तो मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलला. त्यामुळेच दररोज ट्रेनने प्रवास करणारी मी आज अशी बस स्टॉपवर उभी होते. मला अगदीच बसने अर्ध्या तासावर असलेल्या ठिकाणी जायचे असल्याने फारशी काळजी वाटत नव्हती. शिवाय बस नाही तर रिक्षा, ओला ,उबेर असतीलच गरज पडली तर ऐन वेळी म्हणून वरवरचे मन जरी निश्चित असले तरी मनाच्या एका कोपऱ्यात काळजीचे खोल काहूर होते.

बराच वेळ झाला तरी नेहमी ५-५ मिनिटांवर येणारी एकही बस नजरेस पडत नव्हती. समोर होता तो फक्त एक कोलाहल- गाड्यांच्या हॉर्नचा , लोकांचा आणि या चवताळलेल्या पावसाचा. जवळजवळ अर्ध्या तासाने एक बस आली ती गच्च भरूनच. बसच्या अगदी खालच्या पायरीवर देखील २ जण कसेबसे उभे होते. हे पाहून क्षणभर बसला पाहून तिच्याकडे धावलेली माझी पावले तिथेच अडखळली . बस तशीच पुढे जात गेली न मी आता नव्या बसच्या वाटेकडे डोळे लावून उभी होते. पुढे १-२... ४ बसेस आल्या पण सर्वांची तीच स्थिती. अजिबात चढायला वाव नाही. शेवटी वैतागून मी माझा मोर्चा रिक्षाकडे वळवला. एका हातात छत्री आणि दुसऱ्या हाताने थांबण्याचे इशारे करीत गेला तासभर तिष्ठत उभ्या असणाऱ्या लोकांमध्ये मी पण सामील झाले. पण बहुतेक रिक्षा भरून येत. आणि ज्या १-२ रिकाम्या मिळत त्यांना माझ्या मार्गावर येण्यात रस नसे. रस म्हणण्यापेक्षा त्यांना आज नको ते भाडे घेऊन पुढे अडकण्यापेक्षा सुरक्षित जागी जाऊन उभे राहणे सोयीस्कर वाटे. अंदाजे १५ -२० रिक्षांकडून नकार ऐकल्यावर मात्र मी माझे नवे अस्त्र बाहेर काढण्याचे ठरवले. पण छे ! ओला , उबेर यापैकी काहीच त्या समयी उपलब्ध नव्हते. तेव्हा मात्र काळजीचे सावट चेहऱ्यावर झळकू लागले. नुसत्या पावलांना भिजवणाऱ्या पाण्याची पातळी आता गुडघ्यापर्यंत पोहोचली होती. इथे तिथे फक्त पाणीच पाणी आणि त्या पाण्यात वाहत येणारा कचरा मनाला अस्वस्थ करत होता खरा पण या अस्वस्थतेपेक्षा समोर आलेले संकट कितीतरी मोठे भासत होते. जवळजवळ दिड तास हा असाच घालवल्यानंतर मी पुन्हा एकदा त्या पाण्यात उतरले. पुन्हा रिक्षा शोध सुरु झाला. डोक्यावरची छत्री आता केवळ नाममात्र उरली होती. त्या कोसळणाऱ्या पावसात चिंब भिजून आता थंडी देखील जाणवू लागली. एकवार मोबाईल पहिला आणि एक नवे टेन्शन सुरु झाले. फोनचा चार्ज केवळ १८ %. ... झाले. आता काय करावे काही सुचेनासे झाले. जाण्यासाठी एक वाहन नाही आणि क्षणाक्षणाला वाढणारा हा पाऊस मनाचे धैर्य खचवू लागला. पुन्हा माघारी ऑफिसमध्ये जायचे का? कि घराच्या दिशेने चालायचे ?या दुहेरी प्रश्नात मन थोडेसे अडखळले पण लगेच त्याने  निर्णय घेतला होता आणि पाऊले घराच्या दिशेने चालू लागली. पाण्याचे रान सपासप उडवत याच वेगाने घराकडे निघाले तर २.५-३ तासांत घर नक्कीच गाठेन असे वाटत असले तरी ते इतके सोपे नाही हे देखील मला ठाऊक होते. चालता-चालता भांडुप कडे जाणारी रिक्षा शोधणे मात्र मी अजिबात थांबवले नाही. जेव्हा रिकामी रिक्षा नकार देई तेव्हा एक प्रचंड कळ मस्तकात जाई. आज नाही तर पुन्हा केव्हा हे लोक गरजूना मदत करतील असे न राहवून सारखे वाटत होते आणि तेच नकळत तोंडावाटे निघे. पण कुणावरही त्याचा काहीच परिणाम नाही. मी आपली पुन्हा चालू लागले पुढे पुढे .... काही अंतर पार केल्यावर एक रिक्षा अचानक थांबली. 'भांडुप?...तिथे जायचे असेल तर या. ही रिक्षा भांडुपलाच जातेय.'त्याक्षणी जो काही आनंद मी,मला झाला तो काय वर्णू मी . मी त्वरेने रिक्षात शिरले. ओले चिंब झालेले अंग थरथरत होते पण एक खूप मोठा दिलासा मिळाला.मी तिला सारखे 'धन्यवाद' म्हणू लागले तसे तिने तिची कहाणी सांगण्यास सुरुवात केली. तीदेखील जवळजवळ १ तास रिक्षासाठी उभी होती तेव्हाच हा भांडुपलाच राहणारा रिक्षावाला तिला भेटला आणि तिचा हा प्रवास सुरु झाला होता. त्यामुळेच ती माझी व्यथा नक्कीच समजू शकली असेल आणि तिने मला लिफ्ट दिली असेल. पुढे तिच्या स्टॉपवर तिला निरोप दिल्यानंतर त्या रिक्षावाल्याने देखील खूप मदत केली. जिथवर त्याच्यासाठी शक्य असेल त्याने मला घराच्या जवळपर्यंत सोडण्याचा प्रयत्न केला.

त्या दिवशी वाटले खरेच संकटात कधीकधी चांगले कर्म असेल तर देव भेटतो असे म्हणतात ते खोटे नाही. ती मुलगी किंवा तो रिक्षावाला त्यांपैकीच तर एक नसतील ना? जीवनात बरेचदा असे प्रसंग घडतात जिथे मन सुन्न होते आणि मार्ग सापडत नाही आणि एखादा तिसराच अनोळखी तुमच्यासाठी नवा मार्ग दाखवणारा दिवा घेऊन येतो अशा सर्वांसाठी कृतकृत्य असायलाच हवे. म्हणूनच म्हणतात कि चांगली कर्मे करा, कोण जाणे पुढे कोणत्या स्वरूपात देव येऊन तुम्हाला भेटेल.

- रुपाली ठोंबरे.

Thursday, August 24, 2017

बाप्पा...लवकरच ये आता



आज एक वर्ष पूर्ण झाले, बाप्पा...तुला तुझ्या घरी परत जाऊन...
आणि
आता पुन्हा चाहूल लागली... ती तुझ्या आगमनाची.
बाप्पा,काय सांगू मी तुला?
कित्ती वाट पाहत होते मी या दिवसाची.
कारण तुझ्यासोबत सर्वच 
हरवलेलं परत येतं ना आपसूकच...
पण काही म्हण, तू येतोस ते आनंद घेऊनच...
प्रसन्नतेचा सडा शिंपडत,
तुझ्या स्थानी विराजमान होतो,
तेही मोठ्या थाटात.
हाच थाट मला फार फार आवडतो...
पाहायलाही आणि तुझ्यासाठी करायलाही 
उद्या बघ, सारे रस्ते कसे 
तुझ्या जयघोषाने भरून येतील .
मुंबई, पुणे, नाशिकचं नव्हे तर परदेशातही 
तुझं स्वागत मोठं दणक्यात होईल.
साऱ्या दिशा ढोल पथकांनी दुमदुमतील...
ताशांसवे लेझीमही फेर घेऊन नाचेल...
गणेशगीतांनी वारे भक्तिमय होतील...
अबीर गुलालाचे मेघ सर्वत्र पसरतील...
आणि सर्वांवर पाऊस होईल,
तो तुझ्या गोड आशीर्वादाचा .
घराघरांत दूर गेलेले जवळ येतील...
सारे रंग एकमेकांत मिसळून जातील ...
रम्य आरास, सोबत रोषणाईची मेखला,
गोडधोडाची तर स्पर्धाच सुरु असेल, 
त्यातही मोदकाला मोठा मान... 
फळा-फुलांची तबके, नैवेद्याचे ताट... 
असा सुरेख थाट फक्त तुझ्यासाठी.
दिव्यांच्या प्रकाशात तुझे साजिरे रूप,
मनाचा अंधार हळूच दूर करत असते
आज त्याच तुझ्या गोजिऱ्या रूपाची आस आहे ,
तुझ्या दर्शनाचा या जीवाला खूप मोठा ध्यास आहे...
देवा, वेशीवर पोहोचलाच आहेस
आता जास्त वेळ नको दवडूस.
बाळ, राजा अशा कोणत्याही रुपात ये ...
पण उद्या लवकरच ये तुझ्या भक्तांसाठी.
हे काय , आम्ही तयारच आहोत बघ
दारी आतुरतेने तुझ्या स्वागतासाठी.



" गणपती बाप्पा मोरया 
वाट पाहतो आम्ही,
तुम्ही लवकर या 

एक दोन तीन चार 
 गणपतीचा जयजयकार !!!"

                                                        - रुपाली ठोंबरे. 
वाचण्यासारखे अजून काही :
 

Friday, August 18, 2017

विश्वासांकुर

त्या एका निमिषात 
योग असा सुरेख जुळून आला 
कळत नकळत आज
नव्या नात्याचा जन्म झाला 

विश्वासाच्या अंकुरातून  
मैत्रीच्या पानांना बहर आला 
दूरवरच्या जुन्या नात्यातून 
मायेचा वटवृक्ष पल्लवित झाला 

त्या दो निखळ जीवांची
होती एकाच नावेतील व्यथा 
त्या प्रांजळ संवादाची 
आरंभ-अंत जणू एकच कथा 

आठवणींनी साठलेले 
 कुंभ मनांचे आज झाले रिते
शब्दांनी गुंफून फुललेले  
 भिजले तृप्तीत पुन्हा नव्याने नाते  

सुख-दुःखाच्या आठवांचे 
बरसले शब्द भावनांचे सहज
गुंतलेले गणित आयुष्याचे 
उलगडत गेले नकळत आज 

न विचारलेल्या प्रश्नांना 
आज मिळाली भावनांची उत्तरे 
गुदमरलेल्या श्वासांना 
आज गंधाळती सहवासाची अत्तरे

- रुपाली ठोंबरे.





Wednesday, August 16, 2017

शुभेच्छा साखरपुड्याच्या !!!



 या हातातून त्या अनामिकेत 
 त्या हातातून या अनामिकेत 
आजच्या सुदिनी 
झाले दो अंगठ्यांचे स्थलांतरण 

साखरपुड्याच्या सोनसोहळ्यात 
दो अनोळखी जीवांचे झाले  
आजच्या सुदिनी 
गोड प्रेमाच्या नात्यात रूपांतरण 

शुभेच्छा साखरपुड्याच्या !!!

- रुपाली ठोंबरे. 

Thursday, August 3, 2017

गप्पा...जीवनाचा एक अविभाज्य घटक

चारचौघी एकत्र आल्यात.... कि हमखास रंगतात त्या गप्पा.अगदी बायकाच नाही तर पुरुष असतील तर तेही दोन जण एकत्र आले कि मग सुरु होतो गप्पांचा एक रोजचाच वाटणारा पण रोज नवा वाटणारा शाब्दिक प्रवास...मग त्याला वयसुद्धा बंधन नसते. फक्त जसजसे वाढत जाते, तसतसे या गप्पांचे स्वरूप मात्र हमखास बदलत जाते...पण तरी माणूस म्हणून जन्माला आलो आणि बोलायला येऊ लागले तसे चार नवे शब्द सुचू लागले, रोज नवे अनुभव जीवनाच्या अंगणात खेळू लागले आणि गप्पा हा एक रोज नवा वाटणारा पण जुनाच सवंगडी कायमचा या जीवाला चिकटून बसला. पुढे अनेक मित्रमैत्रिणी भेटतात , नातेवाईकांची संख्या वाढत जाते पण त्या  सवंगड्याच्या सहवासातच जगातील सारी नाती खऱ्या अर्थाने फुलू लागतात ... आणि मग  जीवन प्रवास दिवसेंदिवस बहरत जातो . कधी या गप्पांमध्ये आनंदाचा दरवळ असतो तर कधी कटकटी, तक्रारींचा वास, कधी भूतकाळी आठवणींच्या कथा तर कधी भविष्यासाठी नवा मार्ग. खरेच अशाप्रकारे, या गप्पा सर्वांच्याच जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे.

 त्यादिवशी सहजच बागेत फेरफटका मारत असता विविध वयाची विविध प्रकारचे लोक दिसत होते. कुठे छोटीशी रिया ,प्रिया,टिनू आणि मिनू त्यांच्या भातुकलीच्या खेळांतली मज्जा एकमेकांना छान हावभाव करत कथन करत होत्या तर बाजूलाच बंटी आणि मिंटू आपल्या नव्या पराक्रमांची गाथा एकमेकांना ऐकवत होते.६ वर्षांच्या खालील मुले जितके नाजूक तितक्याच त्यांच्या बोबड्या बोलांमधले संभाषण देखील निरागस. एका ठिकाणी शाळेत जाणारी मुले गृहपाठाच्या याद्या मनात गिरवत होते तर मध्येच इकडच्या तिकडच्या गोष्टी पंख फुटून त्यांच्याजवळ यावे तसे नवनवे विषय त्यांच्या गप्पांमध्ये येत. तरुण मुलं मुलींचे तर जगा वेगळे विषय सुरु असतात. कधी त्यांत प्रेमाचे अंकुर फुटत असतात तर कधी आणखी काही. या वयाकडे सर्वात जास्त गप्पांचा साठा असतो. स्त्रियांचे म्हणाल तर गप्पा अगदी ठरलेल्या...लग्नाच्या वयात आले कि स्वतःच्या सौन्दर्यापेक्षा आणखी कोणताही विषय खास वाटू नये... लग्न झाले कि सासर आणि माहेर या भोवती त्यांच्या गप्पांचा सारा पसारा... त्यातही हमखास न चुकता कुणाची वारंवार नोंद होत असेल तर ती म्हणजे सासू आणि नवऱ्याची. आई असेल तर तिला जिथे तिथे फक्त आपले मुलच दिसत असते... मग त्या यशोदेच्या बोलण्यातही नित्य तिचा कान्हा अथवा राधाच असते. या स्त्रियांच्या गप्पांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्या आपल्या इतकीच इतरांची देखील फार दाखल घेतात. कुणाचे काय सुरु आहे हे जाणून घेण्यात विशेष रस. वयानुसार त्यांचे विषय भले कितीदेखील बदलत राहतील पण त्यांचा गप्पांचा स्टॅमिना मात्र सेम असतो. पुरुषांच्या गप्पांत घरातल्या कुरकुरीपेक्षा आजूबाजूच्या सामाजिक घडामोडींची ओढ जास्त दिसून येते. आणि आपले आजीआजोबांच्या वय म्हटले कि अध्यात्म ,नाती ,जुने दिवस ,आजचा वर्तमान यांची गर्दी अधिक. तर थोडक्यात सांगायचे तर वय , प्रकार कितीही असले तरी गप्पा असतातच फक्त प्रत्येकाचा आपला छंद मात्र निराळाच.

या झाल्या आपण नित्यनेमाने पाहत आलेल्या गप्पा पण कोणी म्हणे स्वतःबरोबर देखील गप्पा माराव्या... किंवा देवाबरोबर गप्पा माराव्या. अरे पण असे केले तर लोक वेडा नाही का म्हणणार? पण हे देखील खरेच बरे. क्षणभर विचार केला तर आपल्याही बुद्धीला पटेल कि आत्मचिंतन सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे. कधीकधी वायफळ गप्पा मारण्यात आपल्या वेळेचा अपव्यय करण्यापेक्षा कधीतरी स्वतःतल्या स्वतःला सुद्धा भेटण्याचा प्रयत्न केला तर ...? इतरांशी मारतो तशा गप्पा कधीतरी स्वतःशीदेखील केल्या तर ... ? त्यातून बऱ्याच न उच्चारलेल्या प्रश्नांची ओळख होईल...  कदाचित अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे देखील मिळतील... नवे मार्ग... नवे प्रोत्साहन... कुठेतरी न सांगता येणारी गोष्ट सांगितल्याने एक वेगळेच समाधान मिळेल... आणि मन कसं मोकळं होऊन जाईल.


- रुपाली ठोंबरे.
सदर लेख वृत्तपत्रात छापून आला आहे.


Blogs I follow :