Tuesday, December 29, 2015

लग्नशुभेच्छा … दादा आणि वाहिनीसाठी ।

" आज तुमच्या जीवनातील 
एक अनमोल दिवस 
स्वप्नांतून सत्यात उतरणारा 
एक शानदार दिवस "
 
शहनाईच्या सूरांत ,
अन पुष्पांच्या सहवासात ,
पार पडणारा हा शुभदिन 
यावा तुम्हां उभयतांच्या जीवनी सतत ।

दोन पुष्पांचे हे मिलन,
एक नाजूक विवाहबंधन ,
आज बांधले म्हणून ,
सुखी राहावी ही मनांची गुंफण ।

या पुष्पांच्या परिमळाने ,
सुख-दुःखांच्या संगतीने ,
एकमेकांवरच्या प्रीतीने ,
उजळावे सोनेरी भविष्याने ।

हीच सुंदर , गोड शुभेच्छा ,
आजच्या आनंदमयी सुदिनी ,
दादा-वहिनी, तुम्हां देण्याची इच्छा ,
आहे या छोट्या बहिणीच्या मनी ।

- रुपाली ठोंबरे .

Friday, December 25, 2015

गारवा... भासतो रोज नवा


थंडीतली पहाट, आणि तिच्यासोबत वाऱ्यासवे येणारी धुक्याची लाट मनात एक ताजा उत्साह निर्माण करत आयुष्यात जेव्हा येते तेव्हा नकळतच या गारव्यात शब्द फुटतात आणि स्वरलयींवर विहरत सभोवताली पसरतात .


पहाटेची थंड दुलई, 
झोंबणारा गारवा 
 रोज भासतो नवा, 
वाटतो तो हवा हवा 

दिशदिशांत विहरल्या,
 गार त्या हजार लाटा 
हरवल्या धुक्यात साऱ्या, 
दिशांतल्या पाऊलवाटा 

माळरानी पानोपानी बहरले, 
सोहळे हिरवे नवे 
फूलपान नटले सारे आज, 
सप्तरंगी अनंत दवांसवे 

पावलांस स्पर्श दवबिंदूंचा, 
मनात दाटे मृदू ओलावा 
शिळ घालीत येई वारा , 
दूर जणू वाजे हरीचा पावा 

अशा गारव्यातही 
ऊन कोवळे वाटे हवे 
रोजचेच असूनही सारे 
रोज वाटावे जग नवे 

- रुपाली ठोंबरे . 


Sunday, December 20, 2015

मैत्रिणी...एक अनोखा नजराणा !

कविता लिहिण्याचा छंद तसा मला शाळेत असतानाच जडलेला. पण त्याला पुन्हा खतपाणी मिळाले मी इंजिनिअरींगला असताना. अगदी अनोख्या पद्धतीने मी याला जोपासले.फ्रेन्डशिप-डे असो किंवा बर्थ-डे , छोट्या मोठ्या भेटवस्तू मैत्रिणींकडून मिळत राहायच्या. मलाही वाटायचे की त्यांनाही काही आपल्याकडून निराळे असे काही द्यावे. पण काय ? खूप विचार करायचे…आणि मग एकदा एक युक्ती सुचली. ज्याही मैत्रिणीला भेट द्यायची तिचे नाव(अर्थ),स्वभाव (तो इतके दिवस सहवासात राहून सहज  लागतो),तिचे व्यक्तिमत्त्व,तिच्या सोबतच्या आठवणी आणि मला तिच्याबद्दल वाटणाऱ्या भावना या सर्व अस्तित्त्वात असणाऱ्या गोष्टींना माझ्या कल्पनांचा आणि शब्दांचा नाजूक मुलामा देऊन त्यातून तितकीच सुंदर पण भावनिक ओढ निर्माण करणाऱ्या कवितेची निर्मिती करावी. हे काहीतरी मनात सुचलेले बुद्धीलाही पटले आणि जमेल तेव्हा आणि असा योग घडून आला त्या प्रत्येक वेळी मी अशी एकेक मैत्रिण कागदावर उमटवू लागली. असा बऱ्याच जणींच्या चेहऱ्यावर स्मित आणणारा असा हा बराच संग्रह इतक्या वर्षांत कॉलेज, परिक्षा, नोकरी, लग्न या सर्वांच्या जबाबदारीच्या ओझ्याखाली पार खाली राहून गेला होता. तोच जणू आज गवसला आणि इथे तसाच्या तसा अवतरला…मैत्रिणी… जसा एक अनोखा नजराणा…   !

कविता
या जीवनात असंख्य कविता आल्या 
ज्या मी रचल्या , वाचल्या आणि गायल्या 

पण त्यांतुनी एकच निराळी 
मला खूपच आवडली 

शब्दांतून न व्यक्त करता येणारी 
कल्पनांतून हकीकतेत उतरलेली 

तिच्या प्रत्येक कृतीत दडलेला असे अर्थ 
नाही कोणत्या गोष्टीत लपलेला स्वार्थ 

सदा धडपडे जीवनास करण्या सार्थ 
नसे काही तिच्यापाशी जे असे व्यर्थ 

न वाचता येणारी पण समजून घेता येणारी 
कित्येक सद्गुणांना स्वतःत सामावून घेणारी 

कोणालाही आवडणारी अशी ही 
दुसरी कोणी नसून आहे माझीच एक सखी 

आली ही माझ्या जन्मात चुकून 
राहते संगे एक प्रिय सखी बनून 

खरंच धन्य असे तो कवी 
ज्याने अशी ही कविता निर्मिली 


स्नेहा 

आजच्या या सुदिनी जगाच्या बगिच्यात 
एक स्नेहरूपी कळी जन्मास आली 

शांत अशा चेहऱ्यावर हास्याची नाजूक झलक 
जणू उमलते तिची एकेक पाकळी 

आज आमच्याच गुच्छ्यात ,स्नेहाच्या सहवासात 
जाणीव असे तिच्या अस्तित्त्वाची 

मी ही या फुलांत वावरणारी एक कळी 
सदा ही स्नेह्कळी फुलत राहावी ही इच्छा जिच्या मनी 

माझी ही छोटीशी आठवण म्हणून स्वीकार कर 
ही भेट न कोमेजणाऱ्या शब्द-फुलांची 

तुझ्यावरी असावा सर्वांसह देवाचाही स्नेह्वार्षाव 
अन सदा या वर्षांत फ़ुलत राहावी … ही एकच आज देवापुढे मागणी 



मधुरा 

तू आहेस मधासारखी गोड 
नाही तुला कोणाचीही तोड 

आलीस तू माझ्या जीवनात चुकून 
राहतेस संगे एक प्रिय सखी बनून 

तुझ्या ठायी असे माधुर्य आणि चातुर्याचा संगम 
अशी ही मैत्रिण मज लाभली जीवनात प्रथम 

तुझी मैत्री कधी तोडवीशी न वाटे 
म्हणूनच आज ही छोटीशी भेट मी देते 

पण स्वीकार करता दे मला वचन 
भविष्यात कधी विसरणार नाहीस मला चुकून 


प्राची 

सूर्य मावळता जणू दही दिशा हरवती ,
तो एकच दिन मोलाचा ,
जेव्हा जगात एक नवी दिशा जन्माला आली 

ही प्राची जन्मत घेऊन आली ,
सूर्य ज्ञानरुपी प्रकाशाचा ,
हा सूर्य कधी न मावळावा हीच देवापुढे मागणी 


रुपाली 

एकाच नावात दडली तुझी अन माझी प्रीती 
खरंच अशी अनमोल आहे तुझ्यासंगे माझी मैत्री 

आजही ते सारे दिवस आठवतात 
जे रुपाली या एकाच हाकेला साद देतात 

तुझ्या संगे घालवलेला एकेक क्षण 
स्मृतीत साठले गोड आठवांचे तारांगण 

सुखदुःखाच्या वेळी फक्त तुझाच असे एक हात 
आज सर्वांत मिसळली कारण होती तुझीच एक साथ 

दीर्घ सहवासाची आपण कितीतरी पाहिली होती स्वप्ने 
मन दुभंगले तुटता सारे , का हा खेळ खेळला नियतीने ?

पण आजही अन उद्याही तू संगे राहशी 
कारण तुझ्यासारखेच नाव माझेही रुपाली 

रूपाने आणि गुणांनी आहेस तू रूपवान 
खरेच आहे हे ,नाही फक्त खोटे गुणगान 

तुझी मैत्री कधी तोडवीशी न वाटे 
म्हणूनच आज ही छोटीशी भेट मी देते 

पण स्वीकार करता दे मला वचन 
भविष्यात कधी विसरणार नाहीस मला चुकून 


- रुपाली ठोंबरे. 

Sunday, December 13, 2015

लग्न म्हणजे काय आहे ?

काही दिवसांपूर्वी एक लघुकथा वाचनात आली.…एका अशा मुलीची, जिचे होणारे लग्न पत्रिकेच्या गुणदोषांमुळे रद्द झाले आणि याच पत्रिकामिलनाच्या , ग्रहताऱ्यांच्या ,ज्योतिष्यांच्या भरवश्यावर घरच्यांकडून तिचे दुसरीकडे सूर जुळवले गेले…. परंतू पुढे जेव्हा नव्याने गुंफलेले हे नात्याचे जीवनगाणे बेसूर होऊ लागले तेव्हा मात्र या ग्रहांनी किंवा जुन्या नात्यांनी कोणीही कोणतीही साथ दिली नाही… आणि संसार अर्ध्यावरच मोडून नशिबाची एक नवी व्याख्या तिच्या आयुष्यात जन्मास आली. या लघुकथेवरूनच सुचलेले काही…. कदाचित हेच त्या कथेतील नायिकेनेही अनुभवले असेल….तिलाही कधीतरी असेच वाटले असेल.


लग्न म्हणजे काय आहे ?
लग्न म्हणजे काय आहे ?
सुखी संसाराचा मांडलेला थाट आहे
की डाव आहे पत्रिकेचा … खेळ हा ग्रहताऱ्यांचा ?


प्रीतीपाखरास जरी फुटले नाहीत पंख अजुनी
घडून येते मिलन हे, जुळले सारे अंक म्हणुनी

लग्न म्हणजे काय आहे ?
लग्न म्हणजे काय आहे ?
नव्या आयुष्याचा सोनेरी आरंभ आहे
की काळ आहे स्वातंत्र्याचा…शेवट हा साऱ्या इच्छांचा ?


आवडतेही नकोसे व्हावे कुंडलीची साथ नसता
अशा दुर्भाग्यातून शुभ चिंतावे का अट्टहास असा

लग्न म्हणजे काय आहे ?
लग्न म्हणजे काय आहे ?
नवनात्यांच्या कसोटीतला सुंदर क्षण आहे
की भावी सुखाची ग्वाही देणाऱ्या ज्योतिषाचा …निकाल हा शनी-मंगळाचा ?



 -  रुपाली ठोंबरे.







Monday, December 7, 2015

तो मला आणि मी त्याला पाहत उभे


रात्रीचे ११ वाजले. काळोखाची चादर नक्षत्रांची रुपेरी नक्षी घेऊन जगावर पांघरली जात होती . अंगाशी बिलगून जाणाऱ्या गारव्यासंगे येणाऱ्या दारावरच्या मधुमालतीचा सुगंध मनाला नेहमीसारखाच धुंद करत होता….जणू तो झोपी जाण्याचा नियमित संदेश देत होता . रातकिड्यांच्या किरकिरीतही एक मुग्ध शांततेचा आभास होत होता. एव्हाना आमच्या घरातही आवारावर सुरु झाली होती . हळूहळू सारे घरच निद्रेच्या अधीन झाले . आणि मग मीही बाळ झोपी गेल्याची शाश्वती करून घेत हळूच त्या खोलीत शिरले. खोलीत पसरलेला अंधार खिडकीतून आत डोकावू पाहणाऱ्या चांदण्या कवडश्याला अगदी आनंदाने सामावून घेत होता. मी लाईट लावला आणि क्षणात त्या दोघांचे अस्तित्वच नष्ट झाले . आता लख्ख प्रकाशात सर्व भिंती चमकत होत्या. सगळीकडे सर्व काही अस्ताव्यस्त दिसत असले तरी एक विचित्र रचनेत असलेली ती खोली मला नित्य प्रिय होती.

मी मनाशी ठरवल्याप्रमाणे जास्त वेळ न दवडता थेट त्याच्या समोर जाऊन थांबले. तो त्याचा पांढराफटक चेहरा घेऊन तिथेच ऐटीत उभा होता. काल घरी आल्यापासून त्याच्याकडे लक्ष द्यायला मुळी वेळच न मिळाल्याची मनाला कालपासून डसलेली अस्वस्थ खंत आता धुसर होत होती.क्षण…मिनिट… जवळजवळ कितीतरी वेळ तो मला आणि मी त्याला नुसते पाहतच होतो. दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळीच उत्सुकता जाणवत होती. माझ्या मनात येईल त्या दिशेला त्याला वळवून त्याच्या विविध मुद्रा पाहण्यात मी गुंग झाले. तो ही निमुटपणे माझ्या हालचालींना न्याहाळत मख्खासारखा उभा होता. एकदम पेटून उठलेल्या मोहोळाप्रमाणे मनात कितीतरी विचार त्याक्षणी घोंगावत असले तरी माझ्या अचूक भावनांना वाट मोकळी करण्यास का कुणास ठाऊक मन पुढे धजावत नव्हते. स्वतःला व्यक्त करण्यात मला खूप वेळ लागत होता. त्याच्यावरची नजर जराही न हलवता त्याला पाहता पाहताच एक दोन पुस्तके चाळली…मोबाईलवरच इंटरनेटच्या फाइली डोळ्यांसमोरून नेल्या आणि काहीसे गवसल्यागत मी पुन्हा त्याच्याकडे धावून आले.

त्याच्याकडे पाहताना कधी असे वाटे कि तोही माझ्याइतकाच फार उत्सुक आहे तर कधी वाटे थोडा घाबरलेला असेल… पण आता त्याचे भविष्य खरेच माझ्याच हाती आहे ही जाणीव मनाला पुन्हा एकदा झाली आणि मीही नव्या उमेदीने पुढे सरसावले . त्याच्या त्या निर्विकार चेहऱ्यावरून हळूच हात फिरवत असताना त्याने इथपर्यंत येण्यासाठी किती यातना भोगल्या असतील याची जाणीव सहज मनाला स्पर्शून गेली. खरेतर मी कोणी मोठी चित्रकार नाही पण तरी आज मी याला नवे अस्तित्व देणार होते , नवे रंग ,नवे रूप… सर्वच अगदी निराळे,जगावेगळे देणार होते.

मनाशी काहीसा विचार करत मी हलक्या हाताने त्याच्यावर काही रेखाटले. पण तत्क्षणी त्याचा तो पडलेला, उदास चेहरा लगेच माझ्या ध्यानी  आला…. काहीतरी चूक झाली हातून . म्हणून थांबले...सावरले थोडे ... त्यालाही आणि मला स्वतःलाही. पुन्हा नव्याने नवे आकार काढू लागले तसे त्याची गालावरची खुललेली खळी हलकेच मला जाणवली आणि ती पाहून माझ्याही चेहऱ्यावर एक स्मित हलकेच उमलले. लाल ,केशरी ,पिवळ्या ,निळ्या जांभळ्या अशा नाना रंगाचा कुंचला त्याला जसजसा स्पर्शून जात होता तसतसा तो आणखी टवटवीत दिसत होता.त्या मध्यरात्री जेव्हा अवघी अवनी निद्रेच्या खोल डोहात शिरून स्वप्नांच्या दुनियेत शिरत होती पण मी मात्र जागेच होते एखाद्या रातराणीपरी … माझ्या स्वप्नातल्या दुनियेला इथे जगासमोर दिलखुलासपणे मांडण्यासाठी, मनातल्या भावना मुग्धपणे त्याला सांगत मी या रंगसोहळ्यात अगदी तल्लीन झाले होते. सोहळाच तो … जणू होळीच… रंगांची , नव्या कल्पनांची ,गडद-पुसट छटांची,आनंदाची,स्वप्नांची,भावनांची….  मी मला आवडतील त्या रंगांची त्याच्यावर अगदी मुक्तपणे उधळण करत होते आणि तो ती अचूक झेलून घेत दुपटीने माझ्यावर आनंदाची उधळण करत होता.

शेजारच्या माशिदीतून येणाऱ्या अझानचे ते पहिले स्वर कानी पडले तसे रात्रीच्या या रंगलेल्या खेळातून बाहेर पडण्याची वेळ आली असे प्रकर्षाने जाणवले. सहज खिडकीतून बाहेर डोकावले आणि त्या पूर्वेकडून पार डोंगराडून येणाऱ्या सुर्यनारायणाचे दर्शन या नेत्रांस घडले तसे झोपेचे अस्तित्वच आता नष्ट झाले ही चाहूलही मनास लगेच लागली. प्राजक्त अंगणात आता सांडला होता … त्याचा तो मंद सुगंध आता रात्रीच्या रातराणीलाही लाजवेल अशा अविर्भावात चोहीकडे पसरत होता. पक्ष्यांची किलबिल एक नवा उत्साह निर्माण करत आकाशी झेपावत होती. आकाश… सप्तरंगांत न्हाणारे … जसे माझे चित्र… कॅनवासवरचे.… काल रात्री काढलेले… पांढऱ्या रंगावर मात करत उमेदीने  नव्या रंगांमध्ये नटलेले…उगवणाऱ्या नव्या पहाटेची किरणे अंगावर पांघरून अधिकाधिक नवे वाटणारे …

आजही तो असा ऐटीत पण आत्मविश्वासाने समोर उभा आहे… मुग्धपणे एक संवाद नव्याने साधत. त्या अडगळीच्या खोलीतून थेट दिवाणघरात प्रवेश मिळाल्याने स्वारी भारीच खुश आहे. असे आनंदाचे उधाण यायलाच हवे कारण आता तो मख्खपणे उभा राहणारा नुसता निस्तेज कॅनवास नाही तर येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेणारे ,एक गूढ सदा नव्याने सांगणारे अर्थपूर्ण चित्र आहे.

क्षण… मिनिट… जवळजवळ तासभर तो मला आणि मी त्याला पाहत आहे. पण या नजरेत आता एक कृतज्ञता, समाधान, प्रसन्नता दडली आहे आणि ती मला सहज जाणवते आणि कदाचित त्यालाही.

- रुपाली ठोंबरे

Thursday, December 3, 2015

विरामचिन्हे

प्रवीण दवणे यांचे 'विरामचिन्हे' म्हणजे सुगंध, मेनका ,पुढारी ,गोमंतक ,साहित्य मैफल ,लोकप्रभा अशा दिवाळी विशेषांकांत पूर्वप्रसिद्धी लाभलेल्या लघुकथांचा एक सुंदर संच…. वेगवेगळया व्यक्तिमत्वांचे ठसे वाचकांच्या मनात खोल उमटवणारा….आणि या पुस्तकाच्या १५५ पानांत आपल्याला भेटते आणि काही क्षणांसाठी स्तब्ध करते….


साहित्य अकादमीत विशेष पारितोषिक मिळूनही नवऱ्याकडून हव्या तशा अभिनंदनाप्राप्तीसाठी आसुसलेली वसुंधरा.

स्त्री-व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम म्हणून घरी साप पाळणारी सुकन्या.

आयुष्यातील दुःख,एकाकीपण कुरवाळत बसण्यापेक्षा पार समाजापलीकडे जाऊन वयाच्या पासष्टीतही नव्याने पती आणि बाबा होण्याचे सुख अनुभवणारे प्रधानसाहेब हे दृढ व्यक्तिमत्व .

एका नातेवाईकाकडे नोकरी मिळण्याच्या आशेने आलेला पण तिथेच जन्मभर घरगडी बनून राहिलेला सदाचे केविलवाणे जिणे.

 पोस्टमनच्या एका चूकीमुळे जन्मास आलेल्या नव्या नात्याला आकार देऊ पाहणारी मधुरा वर्दे.

अत्तराचा सुगंध देऊन एका लेखकाच्या कलेला वंदन करणारी एक अनामिक रसिका.

पत्रिकेमुळे नियतीने बांधलेली गाठ सांभाळता सांभाळता शेवटी थकून ती सोडवणारी उर्मिला.

विद्यार्थ्याशी असलेले नाते आणि त्यातून उद्भवणारी अपरिचित अफवा अशा क्षितिजावर उभी असलेली अरुंधती.

पावसात भिजलेल्या कुत्र्याच्या पिल्लाशी निर्माण झालेल्या अनुबंधातून सुखावलेली स्नेहा.

एका अनोख्या समजुतीवर टिकणारे,फुलणारे राणे आणि त्यांच्या पत्नीतील एक प्रेमळ नाते.

सेवानिवृत्ती आणि पत्नीनिधना नंतर येणाऱ्या एकाकीपणातूनही मार्ग काढत जीवनात सुंदर क्षणांचे कारंजे निर्माण करणारे शिरगोपीकर आणि त्यांच्या अनंत प्रवासाची कहाणी.

एखाद्या रातराणीसारखी पण प्रेमातही समाजाचे भान ठेवू पाहणारी मार्गारेट .

रंगरुपामुळे नेहमी नाकारली जाणारी पण एक वेगळीच ओढ निर्माण करणारी चिमुकली अरुंधती .

एका ठोकळ्यास्वरूप माणसासोबत संसाराचा हातगाडा चालवता चालवता येणारा हृदयद्रावक शेवट अनुभवणाऱ्या जोगळेकरवहिनी.

पत्नीचा मृत्यू आणि त्यासोबत नकळतपणे संसाररूपी गत आयुष्याचा हिशोब करणारे वामनराव आणि त्यातून आयुष्याच्या शेवटी गवसलेली जीवनाची एक नवी उर्मी .

सर्वगुणी असूनही आदर्श विद्यार्थिनीचा पुरस्कार परत करणारी आणि पुन्हा तोच अधिक मानाने परत मिळवणारी मुग्ध सानप.

हे पुस्तक म्हणजे किती तरी तास आपल्याला रमवून ठेवणारा ,नकळत चेहऱ्यावर हसू आणणारा , काही प्रसंगी मनात चीड आणणारा , गहिवरून टाकणारा आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनाच्या शिशिरात आलेला जणू वसंतच.

- रुपाली ठोंबरे.









Sunday, November 29, 2015

लग्न शुभेच्छा

आज गुंफले रेशीमबंध प्रीतीचे
क्षणात दरवळले गंध सुखांचे

रेशीमगाठीत या जन्मले
इंद्रधनू नव नात्यांचे
सोहळ्यात या सोनेरी
पसरले अलगद रंग प्रेमाचे

मधू स्वरांत गुणगुणले
मिलन हे मृदू भावनांचे
आरंभता संसार रुपेरी
आले घरा वारे शुभेच्छांचे

- रुपाली ठोंबरे.



Wednesday, November 25, 2015

धुंद ती मधुमालती...


धुंद ती मधुमालती 
रात अनोखी अशी 
बहरली काल ती 

विना तुझ्या सर्व रिते 
तुज संगतीत उपभोगते 
स्वर्ग जीवनी जिथे तिथे 

 मंद सुगंध बेधुंद-दंग करी 
अनुराग-रंग तो दाट करी 
 नकळत बंध गुंफले करी 

जन्मांचे सुख घेऊन सारे 
वाहू लागले प्रीतीचे वारे 
स्वप्नांच्या दुनियेत नेणारे

नभी उजळल्या अनंत वाती 
प्रीतसाक्ष देत उभी चंद्रकोर ती 
प्रेमज्योत तेवते तशी तीरावरती 

- रुपाली ठोंबरे



Wednesday, November 18, 2015

मोठ्या विचारांची जादू दाखवणारे पुस्तक

त्या दिवशी वाचनालयात नवे पुस्तक घेण्यासाठी गेले आणि सहज नजर पडली ती " THE MAGIC OF THINKING BIG" by David Joseph Schwartz,Ph.D. या पुस्तकावर . शिर्षकानेच माझे लक्ष लगेच त्याकडे वेधले गेले आणि मी ते घरी घेऊन आले. खूप उत्सुकता होती माझ्या मनात काय बरे असेल नक्की या पुस्तकात …. आणि त्याच दिवशी वाचनास सुरुवात केली. वाचता वाचता बऱ्याच उपयोगी टिप्स , चांगल्या गोष्टी नजरेस पडल्या आणि मनासही पटल्या. आणि मी लगेच टिपण्या काढण्यास सुरुवात केली. सर्वांनाच हितावह असलेल्या त्याच इथे मांडते आहे.

पुस्तकाची सुरुवात होते ती " Believe You Can Succeed And You Will "  या प्रथम धड्यापासून. आपण जसा विचार करतो ते होत जाते. जर स्वतःवर , स्वतःच्या कर्तृत्वावर, प्रयत्नांवर ,यशावर आपला पूर्ण विश्वास असेल तर ती व्यक्ती कितीही अडचणी आल्या तरी शेवटी यशस्वी होतेच हा या धड्याचा संक्षिप्त संदेश. पण असा विश्वास प्रत्येकाच्याच अंगी नसतो तर आपण तो वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. १. नेहमी यशाचा विचार करा, अपयशाचा नाही, २. प्रत्येक दिवशी स्वतःला आठवण करून द्या कि तुम्ही तुम्हाला वाटते त्यापेक्षा अधिक पात्र आहात ३. तुमचा विश्वास नेहमी विशाल असू दया या तीन गुरुकिल्ल्यांच्या आधारे हा विश्वास अंगी बाळगणे कसे शक्य आहे ? तेही या पाठात अगदी अचूक सांगितले आहे.

कोणतेही अपयश एखादे कारण पुढे करून पचवणे हा किंबहुना सर्वांचाच गुणधर्म आहे. मग ती कारणे सतत असलेली नाजूक तब्येत, देवाने दिलेली कमी बुद्धी , वयमर्यादा , नशिब अशी अनेक असतात. पण नेहमी ही अशी यशात अडथळा निर्माण करणारी कारणे  गोंजारत बसून आयुष्य काढले तर यशाचा मार्ग आपणच नाहीसा करतो. पण त्याउलट आपल्याकडे नसलेल्या गोष्टींचा विचार करत राहण्यापेक्षा स्वतःच कणखर बनून येणाऱ्या परिस्थितीचा सामना केला तर यशालाही कधीतरी आपल्या दारी यावेच लागते. आणि ते कसे शक्य होऊ शकते याचे उत्तर म्हणजेच पुस्तकाचा दुसरा धडा "Cure Yourself Of Excusitis,The Failure Disease".

"Build Confidence And Destroy Fear" …नीट वाचले तर या तिसऱ्या पाठाच्या शीर्षकातच खूप काही सांगितले आहे. विश्वास आणि कृती असू द्या म्हणजे भीती आपोआपच नष्ट होईल. नेहमी सकारात्मक विचारांना खतपाणी घातले तर मनातील नकारात्मक तण अपोआपच काळाच्या ओघात नाहीसे होतात आणि आयुष्य एखाद्या वटवृक्षाप्रमाणे बहरून जाईल , विशाल होईल.इतराना बोध देणारी सावली ठरेल .

तुम्ही म्हणाल पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणे मोठा विचार करा हे ऐकायला ,वाचायला तर योग्यच वाटते पण Think big म्हणजे नक्की काय करायचे ? तर हेही "How To Think Big" या चौथ्या धड्यात योग्य उदाहरणांसहित  छान स्पष्ट केले आहे .

"How To Think And Dream Creatively" हा पाचवा धडा मला सर्वात जास्त आवडला.इतका कि "कल्पनात्मक विचार "या विषयावर एक पोस्टसुद्धा मी ब्लॉगवर टाकली आहे.नक्की वाचा …खात्री आहे आवडेलच.

सातवा धडा "You Are What You Think You Are", वाचता वाचता खूप काही सांगून जातो. इतराना आपण कसे दिसतो , वाटतो हे सर्वस्वीरीत्या आपल्या स्वतःबद्दलच्या विचारांवरच अवलंबून असते . जणू एक आरसाच. म्हणून नेहमी स्वतः , स्वतःचे काम यांना महत्त्व दया , इतरांकडून आपल्याला महत्त्व अपोआपच मिळेल . आयुष्यात कोणत्याही प्रसंगी स्वतःला एक प्रश्न विचारा "महत्त्वाचे लोक अशा प्रसंगी काय निर्णय घेणार " आणि त्या उत्तराच्या मार्गावर चाला… ही एक खास गुरुकिल्ली इथे मिळते .

जे काही कराल ते उत्तम करा. आपला सभोवताल नेहमी तुमच्यासाठी चांगलाच ठेवा. आपल्या सभोवतालचा आपल्यावर आणि आपल्या कार्यक्षमतेवर कसा परिणाम करतो आणि त्यापासून चांगले कसे मिळवता येईल हे सोप्या शब्दांत समजून घेण्यासाठी " Manage Your Environment : Go First Class"या पुस्तकातील आठव्या धड्याची पाने चाळावीच लागतील .

आपली शरीरस्थिती ,दृष्टीकोन हे सर्व आपले विचार न सांगता समोरच्याच्या मनात सहज उतरतात. म्हणून 'मी सक्रिय आहे ','मी महत्त्वाचा आहे ' हे सर्व न सांगताच इतराना जाणवून देणे कसे योग्य आणि फायदेशीर हे सांगणारा नववा धडा आहे " Make Your Attitude Your Allies".

यश हे इतरांच्या सहकार्यावर कुठेना कुठे अवलंबून असते हा एक प्रत्येकासाठी स्वीकारता येणारा नियमच आहे . माणूस कितीही मोठा , यशस्वी असला तर ते यश त्याचे एकट्याचे असूच शकत नाही. त्यात अनेकांचा वाटा असतो. पण आपणही कृतज्ञता बाळगून या नात्यांना अधिक घट्ट करण्यासाठी प्रयत्नरत असलो पाहिजे. वेळप्रसंगी मदत करणारे , समजून घेणारे, प्रोत्साहन देणारे अशा सर्वांचीच आठवण करून देणारा दहावा धडा " Think Right Toward People" अशाच असंख्य सहकार्यांना ,प्रिय व्यक्तींना समर्पित.

नुसती पोपटपंची ही कोणत्याही यशासाठी पूरक ठरू शकत नाही. कृती ही नेहमीच खूप महत्त्वाची असते. सर्व काही ठीक होईल तेव्हा मी करेल अशी कारणे देत दिवस पुढे ढकलणे या अपयशाचा मूळ पाया असू शकतो. नुसते हे पोस्ट वाचून छान आहे , पुस्तक वाचायला हवे असे म्हणण्यापेक्षा आत्ताच हे पुस्तक शोधून यातील अकरावा धडा "Get The Action Habbit " वाचून अंमलात आणला पाहिजे.

प्रत्येकाचे यश आणि अपयश हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते . आयुष्यात प्रत्येक गोष्टीतच विजय मिळेल हे जरी शक्य नसले तरी मिळालेल्या अपयशातूनही ज्याला यशाचा मार्ग प्राप्त करता आला तो खरा यशस्वी. प्रत्येक गोष्टीत चांगली बाजू शोधून न हरता सामना खेळत राहिलो तर यशाची ट्रॉफी कधीतरी आपल्या नावावर असेलच , हेच सांगणारा बारावा पाठ " How to Turn Defeat Into Victory" खरेच वाचण्यालायक आहे.

"Use Goals To Help You Grow" हा तेरावा पाठ म्हणजे आपल्या स्वप्नांना, इच्छांना पूर्ण करणारा मार्गच. जोपर्यंत आपले ध्येय आपल्यापाशी नसते तोपर्यंत आपले आयुष्य , काम सर्वच अस्ताव्यस्त असते . एकदा का ध्येय मनाशी बाळगले आणि त्याच्या पूर्ततेचा ध्यास मनात धरला कि अपोआपच जीवनाला एक शिस्त लागते ,नवी दिशा ,नवा मार्ग मिळतो … त्या लक्ष्या पर्यंत पोहोचवणारा.

आजच्या चढाओढीच्या आयुष्यात प्रत्येकालाच कोणत्याही क्षेत्रात मुख्य सूत्रधार बनण्याची लालसा असतेच. या स्वप्नपूर्तीसाठी लेखकाकडून मिळालेली भेट म्हणजेच या पुस्तकातील शेवटचा धडा " How to Think Like A Leader ".

खरेच हे पुस्तक नावाप्रमाणेच जादुई आहे … आपल्या रोजच्या जगण्यात केलेल्या थोड्याशा बदलाने थोर व्यक्तिमत्त्व घडवणारे.




- रुपाली ठोंबरे . 

Monday, November 16, 2015

उमलणारी नवी सकाळ....मालवणारी तीच संध्याकाळ


कोवळी उमलणारी नवी सकाळ आणि एका काळानंतर मालवणारी तीच संध्याकाळ….दिवसाच्या या दोन्ही प्रहरी सारखाच देखावा …. सूर्याचे अस्तित्व शीतल मोहक…. अगदी  हवेहवेसे वाटणारे…. कापसाच्या शुभ्र मेघमयी पुंजक्यांतून डोकावणाऱ्या निळ्याभोर आकाशी….  लाल-गुलाबी-केशरी रंग उधळीत रंगलेली होळीच जणू…एखाद्या चित्रकाराने फिरवलेल्या अदृश्य कुंचल्याचीच ही कमाल…. दूर सौम्य धुक्यातून डोकावणारी धूसर वनराई…. झाडांची ती सुंदर नक्षी…. जिथे विसावती हजार पक्षी…. खाली हिरव्यागार गवताच्या गालिच्यावर सांडलेले सोनेरी ऊन…. जलाशयाच्या दर्पणात आभाळ निळे उतरून …. रंगछटांचा हा खेळ निसर्गात रंगतो ….या रंगसोहळ्यात पाऊलवाटही होऊन सोनेरी….नवदिशा दाखवी आयुष्याला…. दृश्य जरी सारखे…. तरी अंतर तासांचे तयांत….आयुष्य म्हणजे काय?…. या तासांत रोज नवा खेळ खेळून…थकून क्षितिजाशी या देखाव्यात… जरा विसावा घेणे…. 


- रुपाली ठोंबरे

Tuesday, November 10, 2015

सण दिवाळीचा...


"दिवाळी आला सण मोठा , नाही आता आनंदाला तोटा " म्हणत येणाऱ्या या मंगल सोहळ्याच्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा. 


लक्ष चंद्र आज उतरले धरतीवरी 
कोटी चांदण्या झिलमिल…. या भूवरी , या अंबरी

रंगांचे मोरपीस बहरले माझिया अंगणी 
मनात सुख अलगद गवसले….धुंद त्या मधूर क्षणी 

 घराघरांत गोड-तिखट फराळांचा दरवळ
 स्वानंदाचा सडा दूर करी….जीवनव्यथांची ती तळमळ 

झेंडूच्या गंधात मिसळतो उटण्याचा मृदू सुगंध 
सण दिवाळीचा घट्ट करी …. नात्यांचे रेशीमबंध 

दुनियेच्या रंगमहाली रंगली भव्य आतिषबाजी 
शरदाच्या चांदण्यात उधळू आनंद…. दूर करू नाराजी 

हर्ष-शुभेच्छांच्या वर्षावात सुरु झालेले हे नववर्ष 
तुम्हा सर्वांच्या जीवनी आणू दे….सुखसमृद्धीचा नवा स्पर्श

 - रुपाली ठोंबरे.
( umatlemani.blogspot.in)





Monday, November 9, 2015

इराणातून सुटका


" आउट ऑफ इराण " ही एका सुझान आझादी नामक धाडसी इराणी स्त्रीची कथा…एका श्रीमंत घराण्यात वाढलेल्या, लहानपणापासूनच श्रीमंतीत वाढलेल्या सुझानला आईच्या मृत्यूनंतर शिक्षणासाठी दूर परदेशी जावे लागते…तिथे अशा काही घटना घडतात आणि तिला तिथूनही पुन्हा शाहच्या अमलाखाली असलेल्या इराणमध्ये परत यावे लागते. त्यानंतर झालेले तिचे लग्न, लग्न झाल्यानंतर प्रकाशात येणारी त्या इराणी पुरुषाची मानसिकता, आणि शेवटी त्याचा झालेला मृत्यू या अनपेक्षित घडत जाणाऱ्या घटनांसोबतच इराणात त्या काळात झालेली क्रांती आणि तिचे लेखिकेच्या जीवनावर झालेले परिणाम हाच या लघू कादंबरीचा विषय आहे.

शाहच्या काळात,इराणवर असलेल्या पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव अयोत्तुल्ला या नव्या राजकीय सत्तेला मान्य नव्हता. आणि त्याने श्रीमंत, उद्योगपती, पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणाऱ्या सर्वांनाच ताघौती घोषित केले आणि त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे छळ सुरु केला. त्यांची संपत्ती महागड्या गाडया जप्त करण्यात आल्या . लहानसहान कारणावरून तुरुंगात डांबून शारीरिक, मानसिक व सामाजिक छळ केला गेला.

या सर्व प्रकारात नेहमी श्रीमंती अनुभवलेली सुझान अगदी विचित्र पद्धतीने गुरफटून गेली होती. आजारात मरण पावलेल्या नवऱ्याचा तिच्यावर नसलेला विश्वास आणि सासरच्या मंडळींची नसलेली साथ यामुळे ती अधिकाधिक मरणयातना भोगत होती.ताघौतींवर दिवसेंदिवस वाढत असणारा अयोतुल्लाचा जुलूम, अंगावर काटा आणणारे तिचे तुरुंगातील दिवस आणि सुटकेसाठी मुल्लाकडे मान्य केलेली एक अट… हे सर्व तिचे लाडक्या मुलासोबत इराणमध्ये राहणे अशक्य करत होते.

आणि शेवटी इराण सोडण्याचा तिचा घेतलेला ठाम निर्णय, त्यासाठी केलेली तडजोड, तुर्कीस्तानमध्ये सुखरूप पोहोचवण्याची हमी देणाऱ्यांकडून ऐन प्रसंगी मिळालेली अनपेक्षित वागणूक, इराणबाहेर पडण्याचा निवडलेला खडतर मार्ग, त्या मार्गातील असंख्य काटे, बर्फात गारठलेल्या त्या जीवांची झालेली दैना या सर्वांचे भयकारी, धाडसी सादरीकरण हाच या लघुकथेचा मुख्य कणा आहे. या सत्यकथेचा शेवट आणि आज कसा असेल हे जाणण्यासाठी सुझान आझादी आणि एंजेला फेरान्ते लिखित "आऊट ऑफ इराण" (इराणातून सुटका-मराठी अनुवाद ) या पुस्तकाची पाने उलटवून पाहणेच योग्य.

- रुपाली ठोंबरे

Monday, November 2, 2015

तुझं हसणं....आनंदाचं देणं


जे कधीकधी अथक प्रयत्नांनी साध्य होत नाही ते एका हसण्यानेही सहज शक्य होते. रूप, रंग सर्वांपलीकडेही जाऊन भावनांचा अनोखा संवाद मुग्धपणाने सांगणारी, स्वतः सोबतच इतरांच्याही जीवनात सुख-हास्य-आनंदाचा मुक्तपणे सडा शिंपणारी प्रत्येकाला लाभलेली एक देणगी….आपलं हसणं. 

या वर्षावात आनंदरंग उधळत न्हाऊ दया सबंध सृष्टीला….आणि अशाच तृप्तीत या मनाला.






 जरी नसेल मोत्यांचं लेणं
 तरी असावं आनंदाचं देणं
 दुःखाच्या गडद मेघातून जणू
 पसरणारं सौख्याचं चांदणं

  भावनांचं असं खोल जाऊन मनात लपणं
  ओठांच्या कोरीतून तेच हळुवार सांगणारं
  तुझ्या-माझ्या मनाला जोडणारा दूवा जणू
  असंच असावं नकळत उमलणारं तुझं हसणं

 आसवांनाही माझ्या असं मुग्ध तुझं जाणणं
 त्या आसवांतही हळूच नवी चमक आणणारं
 तुझ्या-माझ्यातला अनोखा मुग्ध संवाद जणू
 असंच नित राहावं चेहऱ्यावर मंद तुझं हसणं 

- रुपाली ठोंबरे.

Thursday, October 29, 2015

जोपासा कल्पक विचार

" जोपासा कल्पक विचार " हे शिर्षक वाचून 'कल्पक विचार' म्हणजे नक्की काय ? असा प्रश्न नक्कीच मनात निर्माण झाला असेल. तर ' कल्पक विचार' म्हणजे एखाद्या गोष्टीकडे नव्याने, सुधारणेच्या भावनेतून पाहण्याचा दृष्टीकोन.…. नवे काही निर्माण करण्याची आपल्या प्रत्येकात असलेली एक खास क्षमता.… जणू अशक्य ते शक्य करण्यासाठी मनात उडणारे योग्य नव कल्पनांचे कारंजेच….

 तर आता तुम्ही म्हणाल ," म्हणजे ही कल्पकता फक्त चित्रकार,मूर्तीकार,लेखक अशा कलाप्रेमी लोकांकडे किंवा शास्त्रज्ञ,अभियंत्यातच असेल. पण नाही. एखाद्या साध्या अगदी रोजच्या जीवनातील कोणत्याही समस्येचे निवारण करण्यासाठी वापरलेली एखादी नवी कल्पना …. जसे तुटपुंज्या पैशांत महिनाभर घर चालवण्याचे  एका गृहिणीचे गृह्कौशल्य, योग्य आराखडा आखून एखाद्या शहराचे नूतनीकरण करण्याची एखाद्या मंत्र्याची कार्यक्षमता,लहान मुलाला चांगल्या उपक्रमात व्यस्त करण्याची कलाशैली, स्वतःच्या आणि इतरांच्या सोयीसाठी केलेली दर्जेदार नोंदणी किंवा एखाद्या ग्राहकाला केलेली अशक्य वाटणारी विक्री हे  सर्व एक प्रकारचे कल्पक विचारच आहेत .

पण प्रत्येकात जरी ही कला अवगत असली तरी तिला योग्य वाट करून देण्यासाठी एखादी अशक्य गोष्टही आपण करू शकतो असा दृढ विश्वास आपल्या ठायी असला पाहिजे. एकदा का ' हे मी करू शकतेच ' असे मनाला ठामपणे सांगितले की त्याची पूर्तता करणारे अनेक कल्पक विचार मनात डोकावू लागतात. आणि त्यातूनच सर्वोत्तम मार्ग शोधून काहीतरी नवनिर्मिती नक्कीच होते.

याचे एक उदाहरण द्यायचे झाले तर कित्येकांना घर, नोकरी सांभाळताना काही नवे शिक्षण घ्यायची इच्छा आणि संधी असूनही ते वेळ मिळत नाही असे कारण सांगताना आढळतात. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे , जेव्हा आपण एखादी गोष्ट अशक्य आहे असे म्हणतो तेव्हा आपले मन आपले हे वाक्य कसे अचूक आहे हे सिद्ध करण्याच्या मागे पडते आणि शेवटी हाती अपयशच येते याउलट जर हे शक्य आहे असे म्हणाल तर नक्कीच नवे मार्ग सापडतील…वेळ मिळत नाही म्हणणाऱ्याना वेळेचे नियोजन करून वेळ उपलब्ध करून घेण्याचे नवे उपाय सुचतील.

यासोबतच जुन्या विचारांत रुतलेले मन हा कल्पक विचाराच्या जडणघडणीत असलेला सर्वात मोठा शत्रू आहे. कारण जोपर्यंत आपण जुन्यातून बाहेर पडणार नाही तोपर्यंत नव्या कल्पनांना वाट मिळणार नाही. एखाद्या नव्या कंपनीत नव्याने रुजू झालेला जर त्याची जुनी कार्यशैली वापरण्याचा प्रयत्न करत असेल तर काही अंशी चुकीचे परिणाम पहावयास मिळतील. याउलट जर नव्या ठिकाणची कार्यपद्धती, उपलब्ध नोकरवर्ग, यंत्रणा या सर्वांचा मेळ घालणारी नवी कल्पना आणि त्यातून सुरु झालेली कार्यपद्धत अंमलात आणली तर नक्कीच यशापर्यंत पोहोचण्यास यशस्वी ठरेल.

लोकमान्य विचारांपेक्षा आपले विचार नेहमी प्रगत ,विकसनशील असावे यासाठी नेहमीच आपण प्रयत्नशील असावे. मग चला तर…अगदी आजपासूनच जुन्या विचारांच्या काळोखामुळे खोल मनात कुठेतरी दडलेल्या,कधीतरी सुचलेल्या किंवा आताही सुचणाऱ्या नव्या अशक्य  कल्पना कागदावर उमटवून, योग्य पडताळणी करून जगाच्या प्रकाशात साध्य करू…आणि यशस्वी होऊ.



- रुपाली ठोंबरे

Sunday, October 25, 2015

"कृती नष्ट करी भीती "

प्रत्येक माणसाच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या प्रकारची भीती असतेच. एकदा एकाने सांगितले ,
खरेतर भीती नसतेच. ती म्हणजे आपल्या मनाची फक्त एक नकोशी वाटणारी कल्पना असते. पण मला वाटते भीती खरोखर अस्तित्वात असते. तिचे अस्तित्व आपण अनुभवू शकतो… भीतीने खंगत चाललेली तब्येत, विविध आजार , जेव्हा बोलावेसे वाटते तेव्हा नेमकी अनुभवास येणारी शांतता ही सर्व भीती दर्शवणारी चिन्हेच आहेत.

भीतीमुळे माणसाला होणारा सर्वात मोठा तोटा म्हणजे खचत जाणारा आत्मविश्वास. खरोखरच भीती ही मनुष्याला लाभलेली एक मोठी नकारात्मक शक्ती आहे.…माणसाला जीवनात जे हवे ते मिळवण्यापासून परावृत्त करणारी. ही एक प्रकारची मानसिक नकोशी वाटणारी गोष्ट आहे.आणि या शक्तीला योग्य पद्धतीने वेळीच आवर घातला नाही तर ही पुढे त्रासदायक आणि तितकीच धोकादायक बनेल यात शंकाच नाही.

भीती नाहीशी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट उपाय म्हणजे त्या भीतीशी संबंधित कृती अंमलात आणा . जेव्हा आपण एखाद्या समस्येत अडकतो तेव्हा जोपर्यंत आपण त्यावर एखादा पर्याय शोधून त्याची अंमलबजावणी करत नाहीत तोपर्यंत आपण असंख्य प्रकारच्या प्रश्नांनी वेढलेलो असतो. परंतू एकदा का 'सर्व ठीक होईल' अशी सकारात्मक आशा बाळगून योग्य तो निर्णय घेऊन त्यादिशेने पाऊले टाकली की अर्धी लढाई जिंकलोच. आणि उरलेली अर्धी … टाकलेले पाऊल यशस्वीरित्या पार पडल्यानंतर.पुढे हीच यशस्वी खेळी आणखी मोठे पाऊल उचलण्यास प्रोत्साहित करतात आणि अशाच प्रकारे आपल्यात प्रगती होत जाते. आणि सुरुवातीला वाटणारी भीती कधी गायब झाली हे आपले आपल्यालाच कळत नाही.

पण यासोबतच एक लक्षात ठेवा, कोणताही निर्णय घेताना उद्भवणारे अनमान, दुविधा, दिरंगाई हे भीतीवाढीसाठी घातलेले खतपाणीच ठरते. म्हणून योग्य निर्णय घेणे जितके महत्त्वाचे तितकीच तो घेण्यासंबंधीची तत्परता मोलाची.

याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे अनेकांना गाडी चालवण्याचे भय असते. पण फक्त मला भीती वाटते म्हणून मी हे करू शकत नाही असे म्हणून अंग झटकले की आयुष्यात खरेच कधीच आपण ड्रायव्हिंग करू शकणार नाही हे आपण स्वतःच सिद्ध करून दाखवतो. अनेकांना उंचीचे ,पाण्याचे ,काळोखाचे भय असते. आणि त्या भयाला सतत एक सबब म्हणून पुढे करता करता आपण ती भीती आणखी खोलवर रुजवत जातो. हे नाही म्हटले तरी एक अयशस्वी माणसाचे लक्षण आहे. 

पण याउलट एक सकारात्मक जिद्द मनाशी बाळगून या भीतीचे कृतीत रुपांतर करण्याचा प्रयत्न केला की योग्य मार्गदर्शन, एकाग्रता, सकारात्मक दृष्टीकोन आणि नवे काही शिकण्याची चिकाटी या सर्वाच्या सहाय्याने नक्कीच माणूस कधीतरी यशस्वी होऊ शकतो. आणि मग यशाची पहिली पायरी यशस्वीरित्या पार पडली की दुसऱ्या पायरीपर्यंत पोहोचण्यास आपल्यातला नव्याने जन्मलेला आत्मविश्वासच मदत करतो. अशा रितीने एक ,दोन ,तीन … अगदी शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचल्यावर पूर्वी वाटणाऱ्या त्या बलाढ्य भीतीचे अस्तित्वच नष्ट होते…आणि उरतो तो एक नवा ताजा आत्मविश्वास….



- रुपाली ठोंबरे 


Friday, October 23, 2015

देवी सिद्धीदात्री

दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी आहे.अणिमा, महिमा, गरीमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी मार्कण्डेय पुराणात सांगितल्या आहेत. देवी सिद्धीदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे.  दुर्गा पूजेच्या नवव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या देवीची उपासना पूर्ण केल्यानंतर साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.





सर्व सिद्धिदायिनी तूच नवमं दुर्गाशक्ती
प्राप्ती ब्रम्हांडविजयाची, करता तुझी पूजाभक्ती

तुझ्या सिद्धीप्राप्तीनेच शिवा लाभले देवीकलेवर
अष्टसिद्धी करुनी धारण शिव तो अर्धनारीनटेश्वर

सिंहावरी कधी कमलासनी तू चार भूजाधारी
शंख-चक्र-गदा हस्ते तू देवी कमळ पुष्पधारी

तुझी कृपा दूर करी दुःख, सुखदात्री तू ,दावी मोक्षाची वाट
देवी सिद्धीदात्री, नवरात्राअखेर असतो तुझाच मोठा थाट

- रुपाली ठोंबरे 




प्रस्तावनेसाठी आभार  : http://mannmajhe.blogspot.in/

Thursday, October 22, 2015

देवी महागौरी

दुर्गा मातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी होय. दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुऊन जातात. भविष्यात पाप-संताप, दु:ख त्याच्याजवळ कधीही येत नाही. तो सर्व प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी होतो.



 
गौर वर्ण तुझा शंख- चंद्र - कुंदफूलापरी
दुर्गा मातेचे रुप आठवे अष्टवर्षा तू महागौरी

वृषभावर बैसून येई तू चार भूजाधारी
त्रिशूळ,डमरू तू अभय - वर मुद्राधारी

शांत स्वरूपी तू श्वेत वस्त्राभुषणांधारी
तुझे पूजास्मरण भक्तास कल्याणकारी

संकटनाशिनी तू सिदधीदायिनी तू पापनाशिनी
शंकरासाठी व्रत कठोर तुझे तू तेज तपस्विनी

अशक्य ते शक्य दिसे मज येता तव चरणी
अलौकिक महिमा तुझा देवी,आले मी तुज शरणी

- रुपाली ठोंबरे.













प्रस्तावनेसाठी आभार  : http://mannmajhe.blogspot.in/

Wednesday, October 21, 2015

देवी कालरात्री

दुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'सहार' चक्रात स्थिर झालेले असते. यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धिंचे दरवाजे उघडू लागतात. या चक्रात स्थिर झालेल्या साधकाचे मन पूर्णत: कालरात्रीच्या रूपाकडे आकर्षित झालेले असते. तिच्या साक्षात्कारापासून मिळणार्‍या पुण्याचा तो भागीदार होतो. त्याच्या संपूर्ण पापांचा नाश होतो. त्याला अक्षय पुण्य लोकांची प्राप्ती होते.ती शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने होणार्‍या शुभ कामांची गणना केली जाऊ शकत नाही. आपण नेहमी तिचे स्मरण आणि पूजा केली पाहिजे.




रूप दुर्गेचे सातवे भयाकारी परी शुम्भंकारी तू
देवी कालरात्री, शुभफळदात्री दुष्टविनाशी तू

विखुर केश,वीजतेज लखलख माळा गळयात
ब्रम्हांडापरी गोल त्रिनेत्र, ,चमक तिन्ही डोळ्यांत

श्वासाश्वासांतून तुझ्या भयंकर अग्निज्वाळा
लंबकर्णावरी आरूढ तू  देह हा तुझा काळा-सावळा

 हस्त दर्शवी अभयमुद्रा अन वरमुद्रा वरदायक
 लोहकाटा अन कट्यार हाती रूप हे शुभदायक

पळू लागती राक्षस-भूतप्रेत, जिथे तुझा आसरा
मन-वचन-देह पवित्र तिथे नाही ग्रहसंकटास थारा

भयमुक्त भक्त तुझे करी यम-नियम-संयम पालन
तुझे नामस्मरण करी भक्तांचे पुण्यार्जन-पापक्षालन

- रुपाली ठोंबरे















प्रस्तावनेसाठी आभार  : http://mannmajhe.blogspot.in/

Tuesday, October 20, 2015

देवी कात्यायनी

दुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'आज्ञा' या चक्रात स्थिर होते. योगसाधनेत या आज्ञा चक्राचे विशेष स्थान आहे. या चक्रात स्थिर झालेला साधक कात्यायनीच्या चरणी आपले सर्वस्व वाहून देतो. परिपूर्ण आत्मदान करणार्‍या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते.


कात्यायनि महामाये महायोगिन्यधीश्वरि । 
नन्द गोपसुतं देविपतिं मे कुरु ते नमः ॥ 





कालिंदीच्या यमुना किनारी
ब्रजगोपी पुजती देवी कात्यायनी
वर मिळावा श्याम मुरारी
हीच आकांक्षा हर गोपमनी

कतपुत्र कात्याच्या गोत्री
जन्मले कात्यायन महर्षी
अनंतकाल तपस्यति भगवती
'स्वगृही देवीजन्म' वरप्राप्ती त्यास अशी 

महिषासुर अत्याचार पृथ्वीवरी 
तत्विनाशाय ब्रम्ह-विष्णू-महेश तेज अंशी
जन्म घेई देवी कात्यायना घरी
अश्विन-कृष्ण-चतुर्थी दिवशी

सप्तमी-अष्टमी-नवमी तिन्ही दिनी
ग्रहण करून पूजा आनंदे महर्षीघरी
दशमीस असूरवध करी महिषासुरमर्दिनी
पुराणकथा ही दुर्गारूप सहावे सार्थ करी

तेजःपुंज ती चतुर्भुजा ती सिंहावरी
वरमुद्रा ती अभयमुद्रा शोभे द्विहस्ती
पुष्प कमळ, खड्ग तळपती वाम करी 
इहलोकातही तेज-प्रभाव जिथे तिची वस्ती

करू कात्यायनी उपासना शुद्ध मानसी 
देई मानवा अर्थ-धर्म-काम-मोक्ष प्राप्ती
ती अमाप फलदायी,सप्तजन्म पापनाशी
देवी कात्यायनी देई भय-दुःख-संताप मुक्ती

- रुपाली ठोंबरे.













प्रस्तावनेसाठी आभार  : http://mannmajhe.blogspot.in/

Blogs I follow :