Friday, September 22, 2017

रंग पसरलेले

पावसाळा सरत  जातो आणि सर्वपितरी अमावस्येनंतर पावसाचा जोर जरा कमी होऊ लागतो. पाऊस जातो जातो म्हणतो पण तरी त्याची अचानक अशी न सांगता असणारी हजेरी टाळता येत नाही. तो तेव्हाही येतोच पण फक्त भेटण्यासाठी.

याच काळात गणपतीनंतर नवरात्रीचे वेध सर्वाना लागलेले असते.देवी हे एक स्त्रीचेच रूप आणि नवरात्र हा देखील प्रामुख्याने स्त्रियांचा सण. अनेकांचे व्रत-उपास असतात. घटस्थापना तर असतेच पण विशेष आवडीचा भाग असतो तो रासगरबा आणि दांडीयाचा. असा हा नऊ दिवसांचा सण म्हणजे देवी आगमनासोबत येणारा उत्साह , आनंद आणि जल्लोष असतो.

फक्त गृहिणीच नव्हे तर ऑफिसला जाणाऱ्यांसाठी सुद्धा हे नऊ दिवस म्हणजे फार विशेष असतात. नवरात्री सुरु होण्यापूर्वीच काही दिवसांपासून या नऊ दिवसांचे नऊ रंग सगळीकडे पसरू लागतात. मग अगदी साधी असो वा अगदी मॉडर्न, सर्वच जणी अगदी उत्साहाने या रंगांच्या उत्सवात सहभागी होतात. खाजगी पेक्षा सरकारी कार्यालयांमध्ये या उत्सवाचे मोठे स्वरूप पाहावयास मिळते. रेल्वे स्थानके , बसेस अशा गजबजलेल्या ठिकाणी तर त्या दिवसाच्या एका विशिष्ट रंगाचे सडेच्या सडे जागोजागी विखुरलेले असतात.

गेला आठवडा भरपूर पाऊस होता. त्यामागे नवरात्र आली आणि नवरात्रीच्या देवीचा पहिला रंग होता पिवळा. काल सगळीकडे पिवळ्या पेहरावांमुळे मुंबईतसुद्धा जेजुरीचे दर्शन घडत होते. आणि आज पाठोपाठ आलेल्या हिरव्या रंगामुळे सगळीकडे हिरवळीचे साम्राज्य पसरल्याचे भास होते. त्यावरूनच सुचलेले काही काव्यरूपात मांडलेले शब्द आणि त्यां शब्दांना प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव सरांनी कागदावर मांडून आज धन्य केले.


- रुपाली ठोंबरे


Friday, September 8, 2017

मी लिहिते...


मी लिहिते... 
हृदयातल्या भावना आणि
त्या भावनांत लपलेलं माझं अंतर्मन,
लपाछुपीच्या खेळात रमलेले 
सुख-दुःखाचे अनेक रंग,
कधी भूत कधी भविष्य-वर्तमान 
आणि यांत दरवळणारे अनेक क्षण ,
हकीकत आणि कल्पनांचे नाना गंध,
या जीवनमालेत माळलेले आठवांचे तुरे ,
गोड-कडू , चढउतारांचे सूरच सारे.

मी लिहिते... 
कारण खूप काही सांगावेसे वाटते 
मन मोकळे करून बोलावेसे वाटते 
गुपित मनीचे समोर कुणाच्या तरी उलगडावेसे वाटते
पण अनेकदा ऐकायला सोबत कुणीच  नसते 
कुणा सांगू कुणा नको हेच कित्येकदा कळेनासे होते 
मग उगाचच ती अस्वस्थतेची इंगळी जन्म घेते
पण मग मी शब्दांचे मोती भावनांच्या धाग्यात 
गुंफायला सुरुवात करते 
आणि मग त्या माळेतून मी स्वतःच हळूहळू व्यक्त होत जाते 

मी लिहिते... 
नेहमीच स्वतःसाठी
स्वतःच्या भावनांना व्यक्त करण्यासाठी
मनात झालेला गुंता सोडवण्यासाठी
मनाचे मनाशीच असलेले नाते जपण्यासाठी
कधी कुणा अनामिकाला त्या भावना भावतात 
शब्दांचे हे तारांगण हवेहवेसे वाटू लागते 
आणि तिथेच माझ्या लिहिण्याला 
एक नवा अर्थ प्राप्त होतो . 

- रुपाली ठोंबरे.



Blogs I follow :