Thursday, January 28, 2016

'विचार'…प्रत्येकाच्या जीवनातील रोजचा पाहुणा

कधी डोळे मिटून शांत बसले तरी तर कधी काम करत असताना, कधी कुणाशी बोलत असताना कधी स्वतःलाच शोधत असताना… तो नेहमीच हळूच माझ्या मनात येऊन जातो. माझाच नाही तर प्रत्येकाचाच हा अनुभव आहे.

कधी चांगल्या रुपात तर कधी वाईटपण घेऊन तो आपल्यात बदल घडवण्याचा प्रयत्न करत असतो. आपण जसा वाव देऊ तसा तो विस्तारत जातो.…अगदी किचकट जाळ्याच्या स्वरुपात ज्याचा गुंता आपण जेवढे गुंतत जाऊ तेवढा वाढतच जातो.कधी हळूच मनात नकळता शिरतो तर कधी आपणच जाणून त्याला आग्रहाचे आमंत्रण देतो. मग हा पाहुणा कधी कधी लगेच जातो तर कधी पार मनाच्या कोपऱ्यात जाऊन कायमचा  आपला तळ मांडून बसतो. कधीकधी आनंदाचे उधाण घेऊन येतो तर कधी आसवांचे पूर. कधी आठवणींसोबत येतो तर कधी तोच आठवणींना झुलवत घेऊन येतो. कधी भविष्यातील गोड स्वप्नांना गोंजारण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी तो येतो.

पण असा हा 'विचार'… कधी नवीन रुपात ,तर कधी जुनाच पुन्हा नव्याने भेटायला नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो. आणि असा एक नव्हे तर अनंत विचारांच्या जाळ्यात आपल्या प्रत्येकाचे मन, मेंदू ,हृद्य सतत गुंतत जाते. प्रकाशाच्या वेगापेक्षाही कोणाचा वेग अधिक असेल तर तो या विचारांचा. चटकन मनात कुठून तरी येतो आणि दुसऱ्या विचाराचे आगमन होताच हळूच खोल मनात कुठे तरी दडून बसतो किंवा एखाद्या पाखरापरी दूर आसमंती उडून जातो… पुन्हा येण्यासाठी.

ज्या मनुष्यरूपी स्थानकापाशी अशी विचारांची ये-जा अधिक ती व्यक्तीच चंचल स्वभावाची. मग अशा अस्थिर मनाप्रमाणेच तोही या जगी स्थिर नाही. पण ज्याच्या ठायी या विचारांना नियंत्रित करण्याचे सामर्थ्य अधिक, त्याच्यासाठी जीवन हे एक अर्थपूर्ण व्यासपीठ होऊन जाते जिथे अचूक ठिकाणी योग्य विचारांचा वापर करून तो या रंगभूमीला आनंदमयी सोहळ्याचे रूप देतो.

खरेतर आपल्या प्रत्येकात ही शक्ती आहे पण तिला जागृत करण्यासाठी कोरडया भक्तीची नाही तर रसाळ फळे देणाऱ्या ध्यानरूपी कृतीची गरज आहे.

- रुपाली ठोंबरे.

1 comment:

  1. Indeed ... and very nicely written .. every word found to be true ...

    ReplyDelete

Blogs I follow :