Thursday, November 3, 2016

यशपूर्तीसाठी मार्गदर्शक... हवा कि नको ?

काल अचानकच पडलेला प्रश्न...आयुष्यात स्वतःचे ध्येय आणि त्यासाठी लागणारा रस्ता स्वतःच शोधायचा कि आपले ध्येय साध्य करण्यासाठी एखाद्यावर अवलंबून राहायचे, वेगळ्या अर्थात सांगायचे तर आपले ध्येय साध्य करण्यासाठी एखाद्याची मदत घ्यायची कि घेऊ नये.

घड्याळाचा मिनिटकाटा कितीदातरी इतर दोघां मित्रांना भेटून जात होता पण माझ्या प्रश्नाच्या दोन्ही बाजू काही केल्या एकत्र येऊन एखादे ठोस उत्तर देत नव्हत्या. तर दोन्ही गोष्टींचे समान फायदे-तोटे. कधी वाटते कि ध्येय आपले तर त्यासाठी इतरांचा काय संबंध, इतरांना का त्रास,त्यांच्या विचारांच्या बंधनांचे ओझे कशाला ... पण मग वाटते फक्त आपल्याच एका डोक्यातून निघणाऱ्या कल्पनांपेक्षा एखाद्या अनुभवी व्यक्तीचे विचार सोबतीला एकत्र आले तर त्या ध्येयाशी पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग नक्कीच मिळेल.

समोर फक्त पर्वतशिखर दिसते आहे पण जाणारा योग्य रस्ता समजत नाही. काय करणार? तिथेच धीर खचून तर चालणार नाही. पण प्रयत्न केला तर एखादा मार्ग नक्कीच नजरेस पडेल. ते उत्तुंग शिखर सर करण्यासाठी तोच रस्ता घेऊन पुढे चालू शकतो. पण कधीकधी होते काय कि एखाद्या नव्या वळणावर त्या रस्त्याला २ फाटे फूटतात. आता यापैकी एकाची निवड करणे तर भागच असते. मग आपल्या बुद्धीच्या जोरावर आणि स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवून त्यांतील एका रस्त्याला आपण आपला साथी बनवतो. पुढे हा साथी कधीकधी चुकीचाही ठरतो किंवा आपला अंदाज अचूक आणि नशीब बलवत्तर असेल तर बरोबरही. बरोबर मार्गावर असू तर ठीक पण चुकून मार्ग चुकला कि मग डगमगायला होते. मग अशा वेळी एखाद्या अनुभवी मार्गदर्शकाची गरज नकळत जाणवते.कधीकधी योग्य मार्गदर्शन ही यशाची एक किल्ली आहे असे म्हणण्यासही हरकत नाही. पण स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाण्याचा मार्ग अवलंबलेला असेल तर थोडे आड वळणे घेत भरपूर सारे अडथळे पार पाडत पुढे चालत राहतो. त्या शिखरापर्यंत पोहोचेपर्यंत त्याने कितीतरी प्रयोग यशस्वी पार पडले असतात त्यातून प्रत्येक पावलाशी नवे काही शिकून त्याचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला असतो.याउलट सुरुवातीपासूनच मार्गदर्शक निवडला तर आपले सर्वस्वी यश तो किती योग्य आहे यावर अवलंबून असते. जर त्याला निवडण्यात आपली चूक झाली नसेल तर आपण नक्कीच शीघ्र गतीने शिकत टोकाशी पोहोचू शकतो. असा मार्गदर्शक आपल्या बुद्धीची आणि कर्तृत्त्वाचाही योग्य वापर करून आपल्याला सबळ बनवतो यात यत्किंचितही शंका नाही. पण त्यातही तो जिथे थांबेल तिथे विश्रांती घेणे ,त्याच्या तत्त्वांच्या बंधनात राहणे हे ओघाने आलेच. कित्येकदा हे आपल्या चांगल्यासाठीही असू शकते. आपल्या शिष्याला योग्य रितीने समजून घेऊन निस्वार्थीपणे योग्य मार्गदर्शन करणारा गुरु मिळणे म्हणजे भाग्यच.

अशा दुहेरी विचारांमध्ये मन अडकले असतानाच आज सकाळी बाबा आमटेंचा एक सुविचार दृष्टीस पडला ,


" दुसऱ्याच्या सावलीत तुम्ही स्वतःची सावली कधीच बनवू शकत नाहीत , त्यासाठी एकटयाला उन्हात उभे राहावे लागते. "
हे तर १००% खरे आहेच पण त्यासोबतच एका उत्तम मार्गदर्शकाची निश्चितच गरज असते असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते?



- रुपाली ठोंबरे


No comments:

Post a Comment

Blogs I follow :