Thursday, August 3, 2017

गप्पा...जीवनाचा एक अविभाज्य घटक

चारचौघी एकत्र आल्यात.... कि हमखास रंगतात त्या गप्पा.अगदी बायकाच नाही तर पुरुष असतील तर तेही दोन जण एकत्र आले कि मग सुरु होतो गप्पांचा एक रोजचाच वाटणारा पण रोज नवा वाटणारा शाब्दिक प्रवास...मग त्याला वयसुद्धा बंधन नसते. फक्त जसजसे वाढत जाते, तसतसे या गप्पांचे स्वरूप मात्र हमखास बदलत जाते...पण तरी माणूस म्हणून जन्माला आलो आणि बोलायला येऊ लागले तसे चार नवे शब्द सुचू लागले, रोज नवे अनुभव जीवनाच्या अंगणात खेळू लागले आणि गप्पा हा एक रोज नवा वाटणारा पण जुनाच सवंगडी कायमचा या जीवाला चिकटून बसला. पुढे अनेक मित्रमैत्रिणी भेटतात , नातेवाईकांची संख्या वाढत जाते पण त्या  सवंगड्याच्या सहवासातच जगातील सारी नाती खऱ्या अर्थाने फुलू लागतात ... आणि मग  जीवन प्रवास दिवसेंदिवस बहरत जातो . कधी या गप्पांमध्ये आनंदाचा दरवळ असतो तर कधी कटकटी, तक्रारींचा वास, कधी भूतकाळी आठवणींच्या कथा तर कधी भविष्यासाठी नवा मार्ग. खरेच अशाप्रकारे, या गप्पा सर्वांच्याच जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे.

 त्यादिवशी सहजच बागेत फेरफटका मारत असता विविध वयाची विविध प्रकारचे लोक दिसत होते. कुठे छोटीशी रिया ,प्रिया,टिनू आणि मिनू त्यांच्या भातुकलीच्या खेळांतली मज्जा एकमेकांना छान हावभाव करत कथन करत होत्या तर बाजूलाच बंटी आणि मिंटू आपल्या नव्या पराक्रमांची गाथा एकमेकांना ऐकवत होते.६ वर्षांच्या खालील मुले जितके नाजूक तितक्याच त्यांच्या बोबड्या बोलांमधले संभाषण देखील निरागस. एका ठिकाणी शाळेत जाणारी मुले गृहपाठाच्या याद्या मनात गिरवत होते तर मध्येच इकडच्या तिकडच्या गोष्टी पंख फुटून त्यांच्याजवळ यावे तसे नवनवे विषय त्यांच्या गप्पांमध्ये येत. तरुण मुलं मुलींचे तर जगा वेगळे विषय सुरु असतात. कधी त्यांत प्रेमाचे अंकुर फुटत असतात तर कधी आणखी काही. या वयाकडे सर्वात जास्त गप्पांचा साठा असतो. स्त्रियांचे म्हणाल तर गप्पा अगदी ठरलेल्या...लग्नाच्या वयात आले कि स्वतःच्या सौन्दर्यापेक्षा आणखी कोणताही विषय खास वाटू नये... लग्न झाले कि सासर आणि माहेर या भोवती त्यांच्या गप्पांचा सारा पसारा... त्यातही हमखास न चुकता कुणाची वारंवार नोंद होत असेल तर ती म्हणजे सासू आणि नवऱ्याची. आई असेल तर तिला जिथे तिथे फक्त आपले मुलच दिसत असते... मग त्या यशोदेच्या बोलण्यातही नित्य तिचा कान्हा अथवा राधाच असते. या स्त्रियांच्या गप्पांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्या आपल्या इतकीच इतरांची देखील फार दाखल घेतात. कुणाचे काय सुरु आहे हे जाणून घेण्यात विशेष रस. वयानुसार त्यांचे विषय भले कितीदेखील बदलत राहतील पण त्यांचा गप्पांचा स्टॅमिना मात्र सेम असतो. पुरुषांच्या गप्पांत घरातल्या कुरकुरीपेक्षा आजूबाजूच्या सामाजिक घडामोडींची ओढ जास्त दिसून येते. आणि आपले आजीआजोबांच्या वय म्हटले कि अध्यात्म ,नाती ,जुने दिवस ,आजचा वर्तमान यांची गर्दी अधिक. तर थोडक्यात सांगायचे तर वय , प्रकार कितीही असले तरी गप्पा असतातच फक्त प्रत्येकाचा आपला छंद मात्र निराळाच.

या झाल्या आपण नित्यनेमाने पाहत आलेल्या गप्पा पण कोणी म्हणे स्वतःबरोबर देखील गप्पा माराव्या... किंवा देवाबरोबर गप्पा माराव्या. अरे पण असे केले तर लोक वेडा नाही का म्हणणार? पण हे देखील खरेच बरे. क्षणभर विचार केला तर आपल्याही बुद्धीला पटेल कि आत्मचिंतन सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे. कधीकधी वायफळ गप्पा मारण्यात आपल्या वेळेचा अपव्यय करण्यापेक्षा कधीतरी स्वतःतल्या स्वतःला सुद्धा भेटण्याचा प्रयत्न केला तर ...? इतरांशी मारतो तशा गप्पा कधीतरी स्वतःशीदेखील केल्या तर ... ? त्यातून बऱ्याच न उच्चारलेल्या प्रश्नांची ओळख होईल...  कदाचित अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे देखील मिळतील... नवे मार्ग... नवे प्रोत्साहन... कुठेतरी न सांगता येणारी गोष्ट सांगितल्याने एक वेगळेच समाधान मिळेल... आणि मन कसं मोकळं होऊन जाईल.


- रुपाली ठोंबरे.
सदर लेख वृत्तपत्रात छापून आला आहे.


2 comments:

  1. अप्रतिम. सुरेश विषय. सुंदर मांडणी. झकास लेखन. लिहीत्या रहा.

    ReplyDelete
    Replies
    1. मला सुरेख म्हणायचं होतं. 😀

      Delete

Blogs I follow :