Thursday, May 28, 2015

झालेली ही भेट जन्मते एक नवे नाते ।।

आकाशातून खाली कोसळणाऱ्या थेंबाप्रमाणे कधीकधी माणसावरही अशी वेळ येते आणि तो अपयशाने खचून जातो आणि आणखी दुःखात राहतो . ज्याप्रमाणे वरून येणाऱ्या प्रत्येक थेंबाला मातीत विलीन व्हायचेच असते त्याचप्रमाणे जन्मलेल्या प्रत्येकाला कधीतरी मृत्यूला सामोरे जावे लागतेच . अशावेळी परिस्थितीने खचून गेलेला एक आधार शोधत असतो .त्यला वाटत असते कि थोडे आणखी जगावे ,आनंद अनुभवावा, इतरांसाठी आपल्या जीवनाचा उपयोग करून या जीवनाचे सार्थक करावे. आणि अशावेळी एका इवल्याशा गवताच्या पात्याचा आधारही अगदी हवाहवासा वाटतो . आणि त्या पात्यासोबत वाऱ्यासोबत आनंदाचे झोके घेत जीवन जगण्याची एक वेगळीच कला असते . आणि यातूनच एक नवे नाते जन्माला येते. उन्हात हाच थेंब आकाशातील इंद्रधनुष्यासारखा सप्तरंगांत चमकत प्रत्येकाचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतो .पण कधीतरी पावलांना आणि नेत्रांना सुखद स्पर्श देत तो पात्यावरून खाली ओघळत जातो आणि जीवनाचे सार्थक झाल्याच्या समाधानाने मातीत विलीन होतो. पाते मात्र या नात्याच्या सहवासाने आणखी ताजे आणि उत्साही होवून नवीन नात्याच्या शोधत वाऱ्यासोबत परत डोलत राहते.

कोसळणाऱ्या पावसासोबत
पार वरून येणाऱ्या थेंबाला वाटे ।
झेलावे असे कुणीतरी
आणखी थोडेसे जीवन जगावे ।।

वाऱ्या-पावसात मुग्ध डोलताना
अलगद झेलून घेई इवलेसे गवताचे पाते ।
भुईमध्ये विलीन होण्या आधी
झालेली ही भेट जन्मते एक नवे नाते ।।

ढगांच्या पसाऱ्यातून वाट काढत
झेप घेत येई खाली दिवे प्रकाशाचे ।
दिसते आकाशी सप्तरंगी कमान
भाग्य उजळले चमचमणाऱ्या थेंबांचे ।।

गवताच्या पात्यावर डोलताना
थेंब सप्तरंगी दवाचे रूप घेते ।
नेत्रांना सुखद इशारा देणाऱ्या
त्या थेंबाचे मन भरून कौतुक होते ।।

पावलांना सौम्य-शीत -सुखस्पर्श देत
हळूच ते पात्यावरून खाली ओघळते ।
गवताचे पाते पांघरून आठवणींच्या खुणा
डोलते परत वाऱ्यासोबत शोधत नवे नाते ।।

- रुपाली ठोंबरे .

Wednesday, May 20, 2015

समजुन घे जीवनाची तू कथा ||

( माणसाच्या जीवनात जोपर्यंत आनंद ,यश ,सुख समृद्धी असते तोपर्यंत तो उत्साही असतो पण बरेचदा दुःखाचा स्पर्श होताच हाच माणूस हरून जातो. पण माणसाने जीवन जगताना जीवनाचे हे खूप मोठे पण तितकेच सोपे रहस्य समजून घ्यायला हवे कि, सुख-दुःख हे जीवनात नेहमीच येत-जात राहते पण येणारा काळ कधीच  थांबणारा नसतो,पुन्हा येणार नसतो. आनंद उपभोगताना आपण कधीतरी येणाऱ्या दुःखाला घेवून रडून क्षण वाया घालवत नाहीत पण दुःखात मात्र कठीण काळानंतर येणाऱ्या  सुखाचा विचार करून नक्कीच वेदना कमी करू शकतो . आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर ध्येय असावे आणि ते मिळवण्यासाठी प्रयत्नांची साथ असावी . पण जेव्हा वाटा हरवून गेल्यासारखे वाटते तेव्हा क्षणभर तिथेच थांबून थोडा विचार करून योग्य पथावर पुढे वाटचाल करणे हेच उदयाच्या   यशाचे,सुखाचे गूढ आहे. जीवन खूप सुंदर आहे.माणसाचा जन्म हे  आपल्याला मिळालेले खूप मोठे वरदान आहे आणि यातही समाधान मानून आनंदी व्हावे. मग ते कसेही असेल तरी ते तितक्याच जोमाने ,आनंदाने जगावे .इथे कधीच फक्त सुख किंवा फक्त दुःख नसते ही खुणगाठ मनाशी बांधून घ्यावी .यांच्या लपाछुपीत जगण्याची मज्जा घ्यावी . आणि खरे पाहता दु:खानंतर आलेल्या सुखाची चव ही न्यारीच असते . याचाही कधीतरी आस्वाद घेवून पाहावा …. )



लाभले हे अमुल्य जीवन-वरदान ।
मानवा, तू मान यातच समाधान ।।

सदा मिळेल सुखाची कोठी
दुःख नसू दे माझ्या पाठी ।
नको बाळगू लालसा ही मोठी
नको अशी ही आस खोटी ।।

जे मिळेल ते घेत जावे
स्मित असू दे या ओठी ।
धैर्य असू दे संगे सोबती
अश्रू जरी येतील कधी ।।

समजुन घे जीवनाची तू कथा
कधी आनंद कधी आहेत व्यथा ।
वस्त्र हे मिश्र धाग्यांचे साऱ्या
चित्र हे सुंदर जरी नाना रंगछटा ।।

लक्ष्य जीवनाचे असू दे मनात
यश हे दडले आहे तुझ्याच प्रयत्नांत ।
धुंदल्या वाटा जरी कधी क्षणार्धात
थांबून जरा करून विचार चालत राहा तू प्रवासात।।

क्षण गेलेले कधीच न येतील पुन्हा
सुख-दुखाची ये-जा मात्र पुन्हा पुन्हा ।
क्षणात जगून घे जीवनाची प्रत्येक तऱ्हा
काळ आज कठोर तरी सुख येईल उदया ।।


- रुपाली ठोंबरे

Tuesday, May 12, 2015

शोभतो देव्हाऱ्यात कृष्णासोबत हा पारिजातक ।।


पहाट झाली कि संपूर्ण धरणी नवे रूप ,नवे तारुण्य पांघरते. नव्याने उमलणारी फुले या सौंदर्यात आणखी भर घालतात.या रंगीत फुलांसवे सुगंध पसरवत सर्व फुलझाडे दिमाखात उभी असतात, नव्याने लाभलेले सौंदर्य अनुभवत असतात. पण पारिजात मात्र खूप वेगळा . तोही या निसर्गात आपल्या रंग-सुगंधाने भर घालत असतो. पण हे सर्व निस्वार्थी मनाने धरणीस अर्पून , तिच्यावर मोती पोवळ्यांची चादर पांघरत असताना स्वतः मात्र तसाच पुष्पहीन होवून जातो . म्हणूनच कि काय , श्रीकृष्णाने फक्त परिजाताची धुळीत पडलेली फुले स्वीकारून त्यास कृतकृत्य केले. आणि देवाचा सहवास लाभून पारिजातकही समाधानी होवून जातो .

काल होता सूर्यास्त, गत झालेल्या रवीची  वाट पहात ।
मग्न होवून स्वतःत, उभा असा दारात, हा पारिजात।।

भुईवर अवतरलेले रत्न हे, जे गवसले समुद्रमंथनात ।
कृष्णप्रीयेच्या मागणीत, इंद्रपुरीतून आले आज अंगणात ।।

मोती पोवळ्यांची आभूषणे करून परिधान ।
शोभतो पारिजात असा रात्रीच्या चांदण्यांत ।।

नजर आकाशात, कधी होईल आता पहाट ।
कधी दिसेल लाल केशरी आकाशाची ती वाट ।।

आतुरला हा करण्या रवीरश्मीचे स्वागत ।
मोती पोवळ्यांचा सडा शिंपला त्याने हासत ।।

सुर्य दिसे पूर्वेस उधळीत रंग नवे नभात ।
संगे त्याच्या नवतारुण्य आले या जगात ।।

रूप गळूनही मंद सुगंधी दरवळ चोहीकडे पसरवत।
पारिजात म्हणे," अर्घ्य पुष्पांचे अर्पण तुज, तात " ।।

फुले मातीस स्पर्शलेली  वेचतो बघ हा भक्त ।
अर्पिता श्रीकृष्णास तोही आनंदतो ही स्विकारत ।।

कवाडातून झरोक्यातून येणाऱ्या सूर्यप्रकाशात ।
शोभतो देव्हाऱ्यात कृष्णासोबत  हा पारिजातक ।।

- रुपाली ठोंबरे. 

Monday, May 4, 2015

घेऊन आठवणींचे आंदण... सोडते मी आज हे अंगण

( मुलीचे लग्न हा सोहळा मुलगी आणि तिचे घरचे यांच्यासाठी खरंच खूप मोठा आणि तितकाच नाजूक प्रसंग असतो. यात लग्नासाठी चाललेल्या तयारींची धावपळ असते , चुकून काही चूक होईल का अशी धास्ती असते ,सुख सोहळा मनासारखा होत असल्याचा आनंद असतो,मुलगी चांगल्या घरी नांदेल याचे समाधान असते आणि त्यासोबतच उदया पासून या घरापासून दूर जात असल्याची कणकणही मनाला खूप त्रास देत असते .
या सुंदर , मंगलमयी विवाहसोहळ्यात सर्वांना गहिवरून टाकणारा असाच क्षण येतो, आणि तो म्हणजे पाठवणीचा….)

घेऊन आठवणींचे आंदण
सोडते मी आज हे अंगण ।
जिथे खेळले रम्य बालपण
इथेच आले भरास देखणं तारुण्य ।।

रोषणाईची मेखला
जणू उतरले खाली तारांगण ।
चौघडाही वाजतो आता
 देत पाठवणीची आठवण ।।

डोईवरी वली पांघरून
पाऊले चालली वाजीत पैंजण ।
हात हातात नव्या नात्याच्या
परी नजर थांबे पाठी घालीत रिंगण ।।

बाबा, लाडक्या लेकीची करा
आता हासत पाठवण ।
आई, गेली जरी दूर नको गं करू चिंता
 नाही विसरेन मी तुझी दिलेली ती शिकवण ।।

नको आणू डोळ्यांत पाणी
जरी चालली दूर तुझी बहिण ।
उन्मळून येतील जुन्या आठवणी
ते प्रेम ते आपल्यातले खोटे-खोटे भांडण ।।

पण दे मला तू आता खरे-खरे वचन
या घरी आणशील तू तसेच नवे सुखाचे क्षण ।
नाही मी आता इथे तरी असावी नेहमी
पाणावलेल्या पापण्यांतही आनंदाची पखरण ।।

आज घरा 
तुला लाभले माहेरपण ।
जाते मी सासुरा
तिथे आहेत नवे आप्तजन ।।

वाट पाहीन मीही
कधी येईल श्रावणसण ।
हासत येईन या घरी
वेचण्या पुन्हा ते मायेचे क्षण ।।

- रुपाली ठोंबरे

Blogs I follow :