Wednesday, November 22, 2017

समिक्षा

लग्न करून नवी नवरी नव्या घरात येते. नव्या माणसांमध्ये स्वतःला मिसळू पाहते. तेव्हा विविध स्वभावाची आणि विविध प्रकारची नाती आणि त्यांच्यासोबत होणारा पहिला संवाद , पहिला सहवास हा एक कुतूहलाचा आणि विशेष भाग असतो... अगदी नव्याने त्या कुटुंबात प्रवेशलेल्या वधू साठी आणि तिचे आनंदाने स्वागत करणाऱ्या परिवार सदस्यांसाठीसुद्धा. या यजमान मंडळींमध्ये सर्वच वयाचे आणि विविध प्रकारचे सारेच जण सामील असतात. अगदी ८५ वर्षांचे आजोबा पण असतात आणि अगदी नुकतीच जन्मलेली एखादी परीदेखील. आणि अशा या कुटुंबात जेव्हा ही नववधू आतुरतेने प्रवेशते तेव्हा तिची नजर शोधत असते एखादी अशी मैत्रीण जिच्यासोबत ती अगदी मनमोकळेपणाने संवाद साधू शकते. मी फार भाग्यवान होते जिला अशा बऱ्याच मैत्रिणी सासरच्या गोतावळ्यात मिळाल्या. 

पण त्यातली सर्वात जवळची वाटणारी आणि जिच्यासोबत वेळ घालवायला, बोलायला कधीही आवडते ती म्हणजे या कुटुंबातल्या बच्चेकंपनीतली एक खास मैत्रीण. खरेतर प्रत्येक घरात ही बच्चेकंपनी म्हणजे नव्याने त्या घरात येणाऱ्यांसाठी सहज संवाद करण्यासाठी जागा निर्माण करणारी महत्त्वाची पिढी. यांच्याशी लगेच कोणीही मिसळून जातं आणि तेही अगदी सहज या नव्या पाहुण्याच्या रममाण होतात. 

अशीच एक नात्याने माझी पुतणी असणारी पण एका मैत्रिणीसारखी असणारी समीक्षा या जीवनात आहे. नाते काही जरी असले तरी मनापासून तिच्यामध्ये मी नेहमी एक छान मैत्रीणच पाहिली. कुटुंबातील कार्यक्रमांच्या निमित्ताने कधी कधी होणाऱ्या भेटी असोत किंवा एकत्र होणाऱ्या सहली...आम्ही कायम एकत्र. एक वेगळ्याच गप्पागोष्टी सुरु असायच्या आमच्यात. प्रत्येक गणपतीत सजावट करताना येणारी धमाल तर कधीच विसरता येणार नाही. मुंबई-पुणे असे दूरचे अंतर असले आणि आपापल्या काम-अभ्यासाच्या किती जरी गडबडी असल्या तरी व्हाट्सअँप वर का होईना पण कायम आम्ही सहवासात असतो. या बालमैफिलीच्या सहवासात आपणही बालविश्व् जगू लागतो ते खरोखर कितीदातरी अनुभवले. थोडीशी शांत , मनमिळावू , कधी खट्याळ , जितकी इतर गोष्टींत चपळ तितकीच अभ्यासात चाणाक्ष...अशी ही सखी म्हणजे एक समीक्षाच, एका नात्यातल्या सुंदरतेची. 

समिक्षा, जशी आहेस तशीच कायम हसत रहा, आनंदी राहा. दिवसामागून दिवस जात राहतील पण तू मात्र कणाकणाने का होईना पण कायम प्रगती करत राहा. कधी चुकून अपयश जरी पावली आले तरी अपयश ही यशाची पहिली पायरी असे समजून त्या क्षणांना सतर्कतेने ओलांडून तू नव्या आनंदात सहभागी हो. हरणे आणि रडणे याचा स्पर्श मात्र कधीही आसपास होऊ नये. कायम प्रयत्न करत राहा... उत्साहाने जगत राहा...फुटणाऱ्या इवल्याशा पंखांतील बळ एकवटून नव्या क्षितिजाशी झेप घे पण सतर्कतेने.. आणि मग बघ तुझ्या आयुष्यातील स्वप्नांची जागा कशी त्यांच्या पूर्ततेने घेतली जाईल. पण या सर्वासाठी गरज आहे ती प्रयत्नांची, मोठ्यांच्या आशीर्वादाची आणि देवाच्या कृपेची. हा आशीर्वाद आणि प्रयत्न करण्याची शक्ती आणि बुद्धी तुला नेहमी आजन्म मिळत राहो हीच आजच्या सुदिनी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि भवितव्यातील पुढच्या अनेक टप्प्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. ही प्रार्थना आणि ही शुभेच्छा हीच तुझ्या वाढदिवसादिवशी तुला माझ्याकडून भेट. ही भेट सदा तुझ्या संगे नक्कीच राहील.

पुन्हा एकदा जन्मदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा !!!


- रुपाली ठोंबरे.

Monday, November 20, 2017

दव भिजले पावसात ...

या वर्षी पावसाळ्याचे स्वागत आणि पावसाची राहण्याची सोय चांगली जय्यत झाली असेल असे वाटते.यावर्षी पाऊस फारच आनंदला वाटते आमच्यावर. म्हणूनच कि काय हिवाळा आला तरी पावसाला काही  आपला निरोप घ्यावासाच वाटत नाही. आता एक-दोन महिन्यांपूर्वीचीच गोष्ट. पावसाळा संपून कित्ती तरी दिवस झाले होते तरी हा पाहुणा जाण्याचे नाव काही घेईना. अगदी कायम सोबत नसेल तरी दिवसातून त्याची एक फेरी हमखास होत असे.प्रत्येकाला पाऊस आवडतो हे जरी खरे असले तरी अगदी त्याचा त्रास होईपर्यंत बरसत राहावे हे मात्र मुळीच बरोबर नाही.एखाद्याला मधुमेह झाला कि साखर व्यर्जच होते.मग हा मधुमेह होईपर्यंत कशाला एवढे साखरेचे अतिक्रमण? पावसा, तुझेही हे असेच झालंय बघ. तू येतोस तेव्हा किती आनंद देतोस...ते सर्व आकाशात जमणारे काळे मेघ , वाहणारा सो सो वारा, आभाळातून बरसणारे हजारो मोती, मातीचा तो मृदगंध , फुटणारी नवी पालवी, वाहणारे निर्झर ... अगदी सर्वच हवेहवेसे वाटते. पण हा अनुभव काही काळासाठी आणि तुझ्या ऋतूतच स्वर्गमय वाटतो रे. सगळीकडे पाणी पाणी झाले कि एका काळानंतर ते नकोसे होते.आणि म्हणूनच तर निसर्गाने ऋतुचक्र निर्माण झाले आहे. पावसाळा झाला कि हिवाळा आणि हिवाळा झाला कि उन्हाळा आणि परत असेच हे जीवनचक्र सुरु. प्रत्येक ऋतूने नव्याने अतिथी येऊन यावे, चार महिने आनंदाने राहावे, आणि पुन्हा निरोप घेऊन जावे. दुसऱ्याच्या कारभारात मध्येच येऊन लुडबुड कशाला? प्रत्येकाची आपली अशी काहीतरी देण, ती त्या त्या ऋतूतच अनुभवण्यात खरे सुख.

पण पावसा, सांग ना ? तुला आता काय झाले आहे ? तुला जावेसेच वाटत नाही का इथून? इतके प्रेम असले तरी आता तू जा म्हणजे तुझे ते अप्रूप नेहमीच जीवाला वेड लावीत राहील. काही दिवसांपूर्वीचे ठीक होते. तेव्हा या हिवाळ्याने आपले पाय रोवले नव्हते अजून. पण आत्ता ? चांगली थंडी पडते आहे आता. पहाटेच चोरपावलांनी थंडी कुशीत शिरते ती दुपारपर्यंत दूर जायचे नाव घेत नाही. आणि संध्याकाळी सूर्याच्या निरोपासंगे त्याला घाबरून दडून बसलेली ही थंडी पुन्हा बिलगून बसते. पहाटेची गुलाबी थंड हवा , धुक्यात हरवणारी पाऊलवाट , पानापानांवर जमलेले दव मोती... हा सर्व हिवाळ्याचा नजराणाही आम्हा सर्वांना हवाहवासा असतो. या थंड गारव्यानंतर अंगावर येणारे सूर्यनारायणाचे कोवळे ऊन आणि त्यातून मिळणारी ऊब...अहाहा हे तर अतिशय अभूतपूर्व. प्रत्येक दिवशी मन आणि अंग या ऊन- गारव्याच्या भेटीनंतरच्या या मोहक स्पर्शासाठी आतुरलेले. आणि आता तूच सांग, अशाच प्रसंगी तू असा आजसारखा अनाहूत पाहुण्यासारखा अचानक तडमडलास तर कसे बरे चालेल ? त्या थंडीत जिथे ऊबदार गरम स्पर्शाची इच्छा तिथे असे गार गार पाण्याचे थेंब आकाशातून बरसू लागले तर... ? बरे तुझे स्वागत करावे पुन्हा नव्याने तर त्यासाठी आमच्याकडे छत्रीसुद्धा नसते. कारण तूच असा वर्दी न देता अचानक आलेला असतो. शुभ्र दाट धुक्याच्या चादरीसमोर तुझे काळे मेघपुंजके नेत्रांना नाही सुखावू शकत.दवबिंदूंनी ओलावल्या पाऊलवाटेवर अनवाणी चालताना मिळणारा आनंद तुझ्या पाण्याच्या तळ्यांनी विरून जातो कारण तुझ्या थेंबांच्या पसाऱ्यात जमलेले हे आता हवेहवेसे वाटणारे दव भिजून वाहून जातात. आणि मग असे झाले कि नकळत मनात तुझा राग येतो. तुझ्या या अशा कारभारामुळे मिळणाऱ्या आजारांच्या निमंत्रणांमुळे दोन शिव्याही पडतील बघ तुला. मग तूच दुखावशील, नाराज होशील आणि पावसाळ्यात येण्यासाठी पुन्हा तुझे नवे नाटक. अरे हो हो , माहित आहे. आम्हीच कुठेतरी कारणीभूत आहोत या असल्या गफलतींसाठी.पण आता ऐक. तू खुशाल जा तुझ्या घरी. तुझ्यासाठी खूप खूप झाडे लावू आम्ही. म्हणजे पुन्हा परत यायला तू तुझी वाट चुकणार नाही. आणि तुझी वेळही जाणार नाही. आता जास्त वेळ दवडू नकोस. उगाच हिवाळ्या-उन्हाळ्याच्या कार्यक्रमात हस्तक्षेप करू नकोस नाहीतर तेही रागावतील आणि तुझ्या ठरलेल्या वेळी तुला ते येऊ द्यायचे नाहीत. सर्वच चक्र बिघडून जायचे. 

पण काही म्हणा आज असा हिवाळ्यात न सांगता आलास खरा. ऑफिसला जाताना भिजवल्याने जरा रागही आला. पण तरी पावसावरचे माझे अतूट प्रेम काही केल्या तुझ्यावर रुसू देत नव्हते. आणि मग धुक्यातून वाट काढत भावनेच्या ओघात भिजलेल्या मनावर नकळत उमटलेल्या चार ओळी चिंब न्हाल्या...


 पाऊलवाट दवात ओलावलेली 
आज पुन्हा नव्याने भिजली
आठवण तुझ्यासवे रंगलेली 
आज पुन्हा नव्याने स्मरली

- रुपाली ठोंबरे.

Blogs I follow :