Tuesday, January 17, 2017

प्रगती... चित्रकलेच्या माध्यमातून.

५ ते १८ वयोगटातील शेकडो मुले- मुली, समोर असलेल्या कोऱ्या कागदांवर आपल्या प्रिय भारतदेशाचे चित्र साकारत आहेत... कोणी आपल्या मनातला काल्पनिक भारत रंगवत होता तर कोणी अवतीभवतीचा खरा भारत. त्या बालमनांच्या कल्पनेतले मोठे विश्व आज माझ्या अवतीभवती होते. सुमारे ७०० चित्रप्रेमी मुलांच्या गलक्यात, त्यांच्या रंगबिरंगी चित्रांच्या सानिध्यात काही काळासाठी स्वतःलाच हरवल्यासारखे वाटत होते. मी उभी होते प्रभादेवी येथील महानगर पालिकेच्या सभागृहाच्या आवारात. सभागृहाच्या आत - बाहेर , इथे - तिथे फक्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनी - त्या परिसरातील विविध शाळांतून खास चित्रकलेच्या ओढीने इथवर आलेले. आणि या गर्दीला इथे आकर्षित करण्याचे मूळ कारण होते, सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त प्रभाविनायक नवरात्रोत्सव मंडळाने आयोजित केलेले चित्रकला मार्गदर्शन शिबीर. हे केवळ शिबिरच नाही तर एक फार मोठी मोहीमच आहे. एक सुंदर मोहीम... विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य वाव देणारी ...भविष्यातल्या स्वच्छ , सुंदर भारताकडे लक्ष वेधून घेणारी... भारताच्या सामाजिक प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणारी .
 

आज कागदावर भविष्यातला भारत उमटवणारी ही मुले आपल्या कल्पनांच्या रंगानी आणि कलाक्षेत्रात अग्रेसर असलेल्या जत्रा टीमच्या मार्गदर्शनाच्या कुंचल्यांनी  २९ जानेवारीला प्रभादेवी ते वरळी दरम्यान सुमारे ४६ मोठ्या भिंती रंगवतील, आणि पुढे जाऊन हीच चिमुरडी मुले या भारताचे उज्ज्वल भविष्य घडवतील. लहान मुलांच्या मनावर या वयातच देशाबद्दलची आत्मीयता अशी चित्रकलेच्या माध्यमातून जागृत करण्याची या मंडळाची संकल्पना खरेच खूप सुंदर आहे. आणि याचे कौतुक आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील केले आहे ही सर्वांसाठीच एक अभिमानाची बाब.


आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने सुरु झालेल्या या  उपक्रमाचे उदघाटन सुप्रसिद्ध हस्ताक्षरकार अच्युत पालव यांच्या हस्ते झाले आणि त्यांनी त्या प्रसंगी विद्यार्थ्यांना दिलेल्या कलेच्या धडयांतुन या उपक्रमाला एक योग्य दिशा मिळाली. समाजात स्वतःचे आस्तित्व निर्माण करायचे असेल तर चित्रे काढली पाहिजेत... मग ती कपडे, डबे,कागद , भिंती कुठेही रेखाटायची ,रंगवायची ... सुंदर चित्रे काढल्याने मनाला आनंद तर मिळतोच पण त्यासोबतच आपण स्वतः घडत असतो. त्यामुळे मुक्त मनाने चित्रे काढा, असे ते आवर्जून मुलांना सांगतात.


इतक्या सुंदर उपक्रमाचा भाग होण्याचे भाग्य मला लाभले असेच मी म्हणेन. इथे मिळणारा अनुभव आयुष्यातील एक  विलक्षण अनुभव आहे असे आवर्जून सांगावेसे वाटते. आणि त्यासाठी खरेच खूप खूप आभारी. या चिमुरड्यांसोबत स्वप्नातला आणि वास्तवातला असा दोन्ही प्रकारचा भारत मुंबईतल्या भिंतींवर उभारण्यासाठी मीही आता फार उत्सुक आहे. या मोहिमेत इतर अनेक मुलांना सहभागी करून घ्यावेसे मला अगदी मनापासून वाटते.... आनंद देण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी सुद्धा.


- रुपाली ठोंबरे.  

No comments:

Post a Comment

Blogs I follow :