Tuesday, April 17, 2018

गरज मानसिकतेच्या बदलाची

चित्रसौजन्य आणि सुलेखन : सुलेखनकार घनश्याम एरंडे
गेल्या काही दिवसांपासून फेसबुक ,व्हाट्सअँप ,ट्वीटर यांसारख्या सोशल मिडीयांवर एका चिमुरडीची बातमी वेगवेगळ्या पद्धतीने  वाचण्यात येते आहे. बातमी वाचतानाच अंगावर काटा आणि मनात राग ,चीड उत्पन्न  झाल्याशिवाय राहत नाही. हे सर्व संपले पाहिजे , काहीतरी केले पाहिजे असे मनोमन वाटू लागते.पण काय ते मात्र कित्येकदा कळेनासे होते कारण या घटनाच अशा निशब्द आणि मनाला सुन्न करणाऱ्या असतात. अशा घटना वारंवार घडत असताना फक्त स्वतःत रममाण होणाऱ्या समाजाबद्दल, फक्त आपला स्वार्थ साधू पाहणाऱ्या काही भ्रष्ट मान्यवरांबद्दल अचानक एक विचित्र चीड , घृणा मनात निर्माण होते. 

याच विचारांच्या प्रवाहात असताना मला अचानक आठवण झाली त्या भावूक लोकांची... ज्यांना भाषणातील काही आक्षेपार्ह वाक्ये , एखाद्या पुतळ्याची झालेली विटंबना, आंतरजातीय समाजाला अमान्य असलेले विवाह देखील सहन होत नाही... आणि ते त्या सर्वाचा विरोध करण्यासाठी जीवही द्यायला तयार होतात आणि जीव घ्यायलाही. ते सर्व लोक कुठे असतील आता ?त्यांना हे सर्व सहन झाले असेल? इथे तर एका जिवंत हाडामांसाच्या कोवळ्या जीवासोबत दुष्क्रुत्य घडते आणि त्यानंतरही अनेक जण त्यावर आक्षेपार्ह बोलतात,आक्षेपार्ह घटना घडत राहतात. अशा वेळी अशा भावनाशील लोकांना तर कितीतरी वाईट वाटले असेल. या सर्वाचा विरोध करण्यासाठी ते रस्त्यांवर उतरतील.न्यायासाठी आक्रोश करतील. फक्त अंधच नव्हे तर आता मूक-बधिर झालेल्या सरकारला योग्य पाऊल उचलण्यासाठी भाग पाडतील. पण नाही! अशा वेळी यांपैकी कोणीही पुढे येणार नाही. कारण ही त्यांची वैयक्तिक समस्या आहे असे मानून अशा गोष्टींतून अंग काढून घेणारी मानसिकता इथे वर्षांपासून रुजून आहे. आम्ही लढू ते फक्त तेव्हाच जेव्हा आमच्या जातीवर किंवा धर्मावर आक्रमण होईल आणि तेही कोण्या एका नेतृत्वाखाली...मग ते नेतृत्व कित्येकदा स्वार्थीही असू शकते आणि त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही. आणि तोपर्यंत बलात्कार , वासनाकांड यांसारख्या शत्रूंचे दिवसेंदिवस वाढत जाणारे अतिक्रमण सर्वांना मान्य आहे... जोपर्यंत त्याची झळ आपल्यापर्यंत पोहोचत नाही.आणि असेही आपल्या इथे वर्तमानकाळातील घडणाऱ्या गोष्टींपेक्षा भूतकाळातील कटू घटनांची पाळेमुळे उपटून काढण्यात किंवा भविष्यकाळातील स्वप्नांसाठी आज मातीमोल करण्यात अधिक रस आहे. जरा विचार करून पहा, जो आक्रोश एखाद्या छोट्याशा धार्मिक किंवा राजकीय घटनेमुळे  देशभर वणव्यासारखा पेटतो तोच अशा काळशत्रूबद्दल का घडून येत नाही ? तेव्हा का धर्माचे , जातीचे , सत्तेचे अडथळे वाटेत निर्माण होतात ? या सर्व दुष्ट प्रवृत्तींवर का एखादा जबर वचक बसत नाही ? आज गरज आहे एका अशा शासकीय दहशतीची ज्यामुळे अशा प्रत्येक नराधमाच्या असे कृत्य करण्यापूर्वी 'करू कि नको ?' असे द्वंदव निर्माण झाले पाहिजे. 

पण सध्या तरी गेली कित्येक वर्षे वाट पाहत असलेला तो कृष्ण पुन्हा जन्म घेत नाही म्हणून मग आता आजच्या द्रौपदीनेच काळाची गरज समजून स्वतः अशा अवेळी होणाऱ्या हल्ल्यास सामना करण्यासाठी समर्थ झाले पाहिजे. सौन्दर्य , नृत्यकला , पाककला यांसोबतच स्वतःच्या बचावासाठी लागणाऱ्या शौर्यकलेचे बाळकडू देखील अगदी बालपणापासूनच प्रत्येक मुलीच्या पालकांनी तिला दिले पाहिजे कारण वासनेच्या आहारी गेलेले काही बेशरम लोक वय पाहत नाहीत ही दुर्दैवाने खरी ठरलेली आजची वस्तुस्थिती आहे.त्यामुळे 'बेटी पढाओ ,बेटी बचाओ' या नाऱ्यात 'बेटीको धाकड बनाओ ' अशी उक्ती समाविष्ट करून त्यावर अंमल करायला हवा. आणि त्याच बरोबर आजच्या प्रत्येक मुलाच्या मनात प्रत्येक स्त्रीविषयी आदर , सन्मान निर्माण करून त्याला योग्य संस्कार आणि शिक्षण देणे ही देखील या काळाची एक वाढती गरज आहे. आणि या सर्वांसोबत एक महत्त्वाचा बदल झाला पाहिजे तो म्हणजे प्रत्येकाच्या मानसिकतेत. आज सकाळीच एक बातमी वाचली कि पॉर्न व्हिडीओ साईट वर जे सर्वात जास्त वेळा शोधले गेले ते त्या चिमुरडीचा नाव. मन सुन्न झाले हे वाचून. काय ही मानसिकता ? तिला आवर घालणे  आवश्यक आहे. आजच्या या यंत्र-तंत्राच्या दुनियेत वाढत्या डिजिटल युगात मुलांनी काय जाणावे आणि काय जाणू नये यावर विशेष लक्ष द्यायला हवे. कारण कुठेतरी या क्रूर शक्तींचा उदय तिथूनही होत असतो. जर योग्य संस्कारांचे सिंचन झाले तर सारेच कृष्ण बनतील आणि भविष्यकाळात कोणत्याही द्रौपदीवर अत्याचार होणार नाही. पण जर त्यातूनही एखादा दुर्योधन निघालाच तर पूर्णपणे सबल झालेली रणरागिणी त्या नराधमावर विजय मिळवून त्याचा हेतू धुळीस मिळवेल, असे या देशाचे भविष्य जेव्हा उदयास येईल तेव्हा पुन्हा अशी निर्भया किंवा आसिफा आणि त्यांना वाचवण्यासाठी,त्यांच्या न्यायासाठी अशी केविलवाणी विनवणी असणार नाही. 

- रुपाली ठोंबरे.

No comments:

Post a Comment

Blogs I follow :