Thursday, February 1, 2018

"ईश्वर अल्ला तेरो नाम"- मेळ भाषांचा...खेळ अक्षरांचा !



" येथे दोन भाषा एकत्र येऊन एकाच व्यासपीठावर नृत्य सादर करत आहेत असा भास होतो आहे "

सुप्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक यांचे हे उद्गार होते एका उदघाटन समारंभातील.उदघाटन...अच्युत पालव आणि सल्वा रसूल या दोन आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सुलेखनकारांनी एकत्रितपणे आयोजित केलेल्या "ईश्वर अल्ला तेरो नाम" या प्रदर्शनाचे. ६ फेब्रुवारी २०१८ रोजी आयोजित केल्या गेलेल्या या उदघाटनाचे प्रमुख अतिथी होते सर्वांचे चाहते अभिनेते नासिरुद्दीन शाह आणि त्यांच्या पत्नी रत्ना पाठक.सर्व मान्यवरांची उपस्थिती,दोघा सुलेखनकारांच्या चाहत्यांची गर्दी आणि सोबत देवकी पंडित यांच्या सुरेल स्वरांनी या उदघाटनसोहळ्याला अतिशय सुंदर रूप प्राप्त झाले. 

या कलादालनातील सर्वच चित्रे खूप सुंदर आणि बोलकी होती. त्यातील प्रत्येक चित्र काहीतरी सांगत होते. दोघांच्या शैली विविध होत्या पण त्या एकत्र आल्याने त्यातील सौन्दर्य अधिक खुलून आले होते.त्यातील अच्युत पालव यांचे देवनागरी आणि उर्दू भाषेतील एकत्रित काम पाहिले आणि क्षणभर वाटले जणू काहीश्या कारणांमुळे एकमेकांपासून दुरावलेल्या या अखंड विश्वातील दोन बहिणी आज एकत्र आल्या...गळ्यात गळे मिळवून एकमेकींना आलिंगन देताहेत...एकाच कल्पनेच्या हिंदोळ्यावर झोके घेत एकच गीत गाताहेत... भले त्या गीताची भाषा,अक्षरे  वेगवेगळी असो पण सूर ,ताल, अर्थ, लय मात्र एकच. दोघींचे स्वतःचेच असे एक वैशिष्ट्य ,स्वतःचीच दुसरीपासून वेगळी अशी एक चाल, एका विशिष्ट संस्कृतीसोबत बांधली गेलेली नाळ पण तरी या दोघी त्या त्या लिपीतील आभूषणांनी नटलेल्या...आणि त्यामुळे दोघीही आपापल्या जागी सुंदर दिसताहेत.उलट एकमेकींच्या साथीने त्यांचे सौदंर्य कैक पटीने वाढले आहे. कोणी कोणापेक्षा वरचढ नाही...किंबहुना त्यांच्यात अशी कोणती चढाओढ सुरूच नाही...या स्पर्धा आणि त्यातून वाद तर आपण माणसांनीच निर्माण केले आहेत.खरेच 'वसुधैव कुटुम्बकम' या उक्तीचा कुठेतरी विसर पडत असलेल्या माणसांना एकत्र आणण्यासाठी या सुंदर विश्वाच्या विविध भाषाकन्यांचा एकत्र मेळ आज असायला हवा. आणि याच उद्देशातून देवनागरी आणि उर्दू या दोन विभिन्न भाषांना कलेच्या माध्यमातून एकत्र आणून एक सुंदर चित्र निर्माण केले गेले आणि काय आश्चर्य! वेगवेगळ्या रंगाच्या, वेगवेगळ्या ढंगाच्या या दोन लिपी जेव्हा एका कागदावर अच्युत पालव यांच्या कुंचल्यातून अवतरल्या तेव्हा त्यातून जे निर्माण झाले ते केवळ अप्रतिम...

"ईश्वर अल्ला तेरो नाम" हे प्रदर्शन केवळ ४० चित्रांचे दालन नाही तर तो एक सुलेखनाच्या रूपातील भाषा आणि लिपी यांना जोडणारा संवाद आहे...रंग-कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी विविधतेला एकत्र आणणारा कलात्मक सेतू आहे. अरेबिक भाषेमध्ये सुलेखन करत असणाऱ्या सल्वा  रसूल यांच्या मते आपला देश अनेक बाबतींत वैविध्यतेने समृद्ध आहे. ही विविधता एकत्र साजरी केली पाहिजे.या प्रदर्शनातील अनेक चित्रांमध्ये ओम आणि अल्ला किंवा ईश्वर आणि अल्ला या शाश्वत पवित्र धाग्यांना सुलेखनकलेच्या माध्यमातून अशाप्रकारे सुंदर रीतीने एकत्र विणले आहे कि त्यातून ओम आणि अल्ला दोघे एकाच परमेश्वराचे रूप आहे असा संदेश समाजात पोहोचेल. ही चित्रे पाहणारे प्रेक्षक नक्कीच समाजातील विविध पार्श्वभूमीतून आलेले असतील ... कदाचित त्यांना कॅलिग्राफीचे अचूक ज्ञान नसेल किंवा चित्रांत वापरल्या गेलेल्या सर्व भाषांचे आकलन नसेल पण तरी त्या चित्रांतून एक सुंदर संदेश, एक आनंद , समाधान नक्कीच मिळेल.समाजातील विविध घटकांतील जनसामान्यांमध्ये शांती आणि एकोपा निर्माण करणे हाच या प्रदर्शनाचा मूळ उद्देश आहे.हाच उद्देश मनाशी बाळगणारे सुलेखनकार अच्युत पालव हे भारतीय कॅलिग्राफीच्या क्षेत्रातील एक नावाजलेले नाव. ते या प्रदर्शनाबद्दल अगदी भरभरून बोलतात कारण ते हे प्रदर्शन म्हणजे इतके वर्षे प्रेम देणाऱ्या समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य मानतात.कला हे समाजात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे एक सुंदर,आकर्षक आणि तितकेच प्रभावी माध्यम आहे असे ते म्हणतात. जगातील भारत हा एकमेव असा देश आहे जो भाषा, संस्कृती , लिपी ,इतिहास अशा असंख्य बाबतींत वैविध्यतेने नटलेला आहे. इतक्या भाषा आणि लिप्या असूनही भारतात त्यांच्यावर हवे तितके काम आतापर्यंत झाले नाही अशी खंत ते व्यक्त करतात. परंतू सोबतच या प्रदर्शनाच्या माध्यमातून कॅलिग्राफी सारखा सुंदर प्रकार नक्कीच जनसामान्यांपर्यंत पोहोचून प्रकाशाच्या झोतात येईल अशी आशा ते व्यक्त करतात. संगीत, नृत्य अशा वेगवेगळ्या माध्यमांसोबत सुलेखनाचे नाते अतिशय सुंदररित्या जोडण्यात यशस्वी होऊन इतरांना प्रत्येकवेळी चकित करणारे अच्युत पालव या प्रदर्शनात आपली कोणती जादू दाखवतील हे नक्कीच उत्सुकता वाढवणारे असेल

खरेतर देवनागरी आणि उर्दू या दोन्ही भाषा एकमेकांपासून फार निराळ्या...भाषा निराळी,लिपी निराळी, त्यांच्याशी बांधली गेलेली संस्कृती निराळी इतकेच काय तर ही भाषा लिहिण्याची दिशा देखील निराळी पण तरी या विभिन्नतेतही एकता दिसून येते ती रेषांमुळे... लिपी देवनागरी असो वा उर्दू, रेषा आणि वळणे ही आलीच...  भले त्यांच्या दिशा वेगळ्या असतील पण एकाच विचारातून साकार झालेल्या वेगवेगळ्या रेषांतून मांडलेल्या शब्दांना मात्र एकच अर्थ असू शकतो. तो शब्द... त्या रेषा... आपल्याला काही सांगू इच्छित असतात...नजरेच्या स्पर्शातून एक मुग्ध संवाद साधत असतात.समोर असणारा शब्द केवळ एका विशिष्ट लिपीत रेखाटलेला शब्द नव्हे तर तो एक विचार आहे... कलाकाराच्या अंतर्मनातून उमटलेला.आजच्या जगात जिथे माणसामाणसातील विश्वासाला तडा जात एक विचित्र भयानक दरी निर्माण होत आहे तिथे गरज आहे शांती प्रस्थापित करणारा, विविधतेतील एकोपा टिकून राहण्यासाठी प्रयत्नशील ठरणारा असा हा सुंदर संवाद अनुभवण्याची. या दोन विविध लिप्यांना आदर देत एकत्र मांडलेल्या, दोन सुलेखनकारांच्या अक्षरांच्या माध्यमांतून साकारल्या जाणाऱ्या सुंदर विचारांच्या अनुभूतीसाठी नक्कीच आवश्यक आहे एक भेट... "ईश्वर अल्ला तेरो नाम" या प्रदर्शनाची.

"ईश्वर अल्ला तेरो नाम"
कॅलिग्राफी प्रदर्शन
स्थळ : नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, वरळी
वेळ : ते १२ फेब्रुवारी , २०१८
         सकाळी ११.०० ते संध्याकाळी वाजेपर्यंत.
                                                                   - रुपाली ठोंबरे.

4 comments:

  1. उत्सुकता शिगेला पोहोचवणारा लेख!सगळ्यांनी आवर्जून भेट द्यावी, छान रुपाली!

    ReplyDelete
  2. खरंच खूपच छान भाषा वापरली आहे लेखनात!!!👌👌👌

    ReplyDelete
  3. खुप छान रुपाली.

    ReplyDelete

Blogs I follow :