Monday, February 19, 2018

श्रीमान योगी

" आयुष्यात कधी खचत चाललो आहे... सर्व बाजुंनी हार होते आहे... योग्य मार्ग सापडत नाही... चहू बाजुंनी भयाण वणव्याने वेढले आहे...तुझ्यावर कधी असा बाका प्रसंग आला तर तेव्हा तू रणजीत देसाई लिखित 'श्रीमान योगी ' वाच. तुला खूप बळ , स्फूर्ती , प्रेरणा मिळेल.

असे काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राने मला सुचवले. आणि काय आश्चर्य त्या काळात त्याचे हे बोल मी स्वतः जगत होते. श्रीमान योगी या पुस्तकाच्या साधारण मध्यावर पोहोचले होते मी तेव्हा. आणि सांगते, तो म्हणाला ते १०० टक्के खरे होते जे मला वाचताना क्षणोक्षणी त्या पानांवरच्या प्रत्येक शब्दातून पटत होते. 

फक्त श्रीमान योगीच नव्हे तर शिवरायांवर लिहिलेले कोणतेही पुस्तक हाती घ्या अथवा त्यांच्यावर लिहिलेली गीते श्रवण करा आपोआपच अंगात एक नवे चैतन्य निर्माण होते. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्त्वच फार थोर. अगदी बालपणापासून आईच्या गोष्टींत सापडलेला हा पराक्रमी पुरुष माझा नेहमीच आवडता राजा होता...माझा सर्वात आवडता हीरो. पुढे तिसरीच्या इतिहासाच्या पुस्तकात शिवरायांबद्दल एक विशेष आदर मनात निर्माण झाला तो आजपर्यंत आणि पुढेही असाच राहणार.

१९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरीवर आई शिवाईच्या कृपेने जिजाबाई या थोर मातेच्या पोटी एका तेजस्वी बाळाचा जन्म झाला आणि महाराष्ट्राचे भाग्य उजळले.जिजाबाईंच्या तोंडून बालवयातच रामायण आणि महाभारताच्या कथांमधून शिवबांच्या बालमनावर संस्कारांचे सिंचन झाले सोबतच दादोजी कोंडदेवांसारखा उत्तम गुरु लाभले आणि हा हिरा स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर पडणाऱ्या या एकेक पैलूने घडत गेला. रोहिडेश्वराच्या मंदिरात त्यांनी शंभू महादेवाच्या प्रेरणेने आणि मूठभर मावळ्यांच्या साथीने हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि हा संकल्प तडीला नेण्यास सिद्ध असलेल्या महादेवाचा आशीर्वाद घेऊन पुढे तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. आणि त्या क्षणापासून शिवरायांना उसंत मिळाली नाही. त्यांच्या पराक्रमांची शृंखला स्वराज्याचे तोरण बांधत गेली. शिवरायांची खरी ताकद होती ती ही मराठी माती... या मातीत जन्मलेले वेळप्रसंगी जीवाची पर्वा न करणारे मावळे आणि या मातीतल्या दगडांनी उभारलेले भक्कम गड आणि किल्ले. येसाजी कंक , तानाजी मालुसरे , फिरंगोजी नरसाळा , कुडतोजी गुजर, बाजीप्रभू देशपांडे अशी कितीतरी स्वराज्यासाठी जीव ओतणारी माणसे पाठीशी होती म्हणूनच आग्ऱ्यातून सुटका असो वा अफजल खानाचा वध , महाराजांच्या हाती फक्त यशच येत गेले. 

भविष्यात स्वतःच्या पराक्रमाच्या जोरावर आणि जनतेच्या विश्वास आणि प्रेमामुळे शिवाजी महाराज उद्याचे छत्रपती झाले. पण इथवर पोहोचण्यासाठी संकटांशी केलेले सामने खरेच चुरशीची आहेत... खूप काही शिकवणारे ... खूप प्रेरणा देणारे आहेत. आपल्या तुटपुंज्या शिबंदीसमोर उभ्या असलेल्या बलाढ्य मोगल फौजांना तोंड देण्यासाठी शिवाजी महाराजांचा गनिमी कावा नेहमीच कामी आला... आणि प्रत्येक वेळी 'शक्तीपेक्षा युक्ती महान' ही उक्ती सिद्ध होत गेली. महाराजांचे सुनियोजित अष्टप्रधानमंडळ हा ते एक महान राजनीतीज्ञ होते याचा उत्तम पुरावा आहे. अशा आपल्या महाराजांच्या किती गोष्टी कथन कराव्या तितक्या कमीच. असे हे आपल्या लाडक्या राजांचे थोर व्यक्तिमत्त्व. पण त्यांनाही स्वकीयांचा मारा , कुटुंबातील तडजोडी या सर्वांचा सामना करावा लागला. त्यांनी हे सर्व कशा पद्धतीने घडवून आणले ते बरेच काही शिकवून जाते. पुरंदरच्या तहात इतके परिश्रम घेऊन उभारलेले बरेच काही मिर्झा राजांच्या हाती सुपूर्द करताना राजांचे कुठेतरी क्षणभर किंचित खचलेले मन आणि जिजाबाईंच्या बोलांनी पुन्हा धैर्याने उभे राहिलेले शिवबा सामान्य माणसाला त्याची लढाई लढण्यासाठी एक मोलाचा संदेश देतात.शिवाजी महाराजांचा पराक्रम वाचताना नकळत रक्त उसळले जाते... मनात राष्ट्राभिमान जागृत होतो... शरीराच्या नसनसांत चैतन्य निर्माण होते. 

श्रीमान योगी वाचताना आलेला हा अनुभव माझ्या आयुष्यासाठी खूप मोलाचा... एखादे पुस्तक स्वतःमध्ये इतका बदल घडवून आणू शकतो यावर कधीकधी विश्वास बसत नाही पण हे शिवचरित्र खरेच प्रत्येकाने अनुभवण्यासारखे आहे... कारण ते खूप प्रेरणादायी आहे. 

'श्रीमान योगी' या पुस्तकाची डिजिटल प्रत

 
- रुपाली ठोंबरे .

1 comment:

Blogs I follow :