Monday, March 21, 2016

छावा…मराठी इतिहासातील एक अजरामर जीवनपट

राजा छत्रपती शिवाजी महाराज … महाराष्ट्राच्या विशाल इतिहासातील एक अजरामर नाव… मराठी स्वराज्य निर्माण करण्याचे ध्येय मनाशी बांधुन या भारतभूमीच्या रणांगणात उतरलेला एक सिंहपुरुष…तर एक दोनच नव्हे तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा सेना-धुरंदर, छत्रपती संभाजी हा एक शिवपुत्र छावाच. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पानांवर आणि मराठ्यांच्या मनात सुवर्ण अक्षरांत आदराने कोरलेले हे दुसरे नाव.

कितीतरी लेखकांनी या महान व्यक्तिमत्वावर बरेच चांगले-वाईट लिखाण केले. पण मराठी साहित्यात संभाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित सर्वाधिक प्रसिद्ध पुस्तकाचा मान मिळतो तो ज्येष्ठ मराठी कादंबरीकार' शिवाजी सावंत ' लिखित 'छावा ' या कादंबरीस. मराठी जगतात असा एकही रसिक सापडणार नाही ज्याने इतर २०-२५ कादंबऱ्या वाचल्या असतील पण छावा नाही. मी ही बऱ्याच वर्षांपूर्वी याचे वाचन केले होते. पण त्यादिवशी पुन्हा 'छावा ' समोर दिसले आणि पुन्हा नकळतच पुस्तकाची पाने चाळली गेली. तोच इतिहास नव्याने वाचताना पुन्हा नव्याने शंभूराजांविषयी आदर वाटू लागला.

खरेतर  १४ मे, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे जन्मलेले संभाजी राजे हे शिवाजी महाराज आणि त्यांच्या प्रथम पत्‍नी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. पण तरीही त्यांचा जीवनकाल अतिशय कठीण होता. जन्मापासूनच बिकट परिस्थितींत अडकत गेले मात्र सिंहाचा पुत्रच तो…येणाऱ्या सर्व परिस्थितींचा निकराने सामना करत हा शूर पुरुष अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणास्थान बनले. जन्मतःच सईबाईंच्या निधनामुळे आईच्या दुधास मुकलेले शंभूराजे त्यांची दूध आई बनलेल्या पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ, थोरल्या मांसाहेब जिजाबाई ,सावत्र आई सोयराबाई यांच्यात आई शोधू लागले. संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले.अगदी लहान वयातच अशा काही घटना घडल्या ज्यामुळे त्यांना मोघलांकडे राहावे लागले,वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी शिवाजी महाराजांबरोबर आग्र्यातुन सुटकेचा प्रसंग त्यांनी अनुभवला, संभाजींच्याच सुरक्षिततेसाठी पसरवण्यात आलेल्या 'संभाजीराजांचे निधन ' या खोटया अफवेमुळे फार काळ परक्या ठिकाणी लपून राहावे लागले.इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले.

राज्याभिषेकानंतर अवघ्या १२ दिवसांत झालेल्या जिजाबाईच्या निधनानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज सतत स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकर्‍यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले.सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या याच्या सांगण्यावरूनच झाले.अण्णाजी दत्तों- महाराजांचे अमात्य,अनुभवी आणि कुशल प्रशासक पण तेवढेच लबाड , भ्रष्टाचारी. त्यांच्या विरोधामुळे शंभूराजांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले. आपल्याला दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेल्याचा सल मात्र संभाजीराजांच्या मनात कायम राहिला.

पुढे वेगवेगळी कारणे देत सोयराबाई आणि दरबारातील मानकर्‍यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला.या सर्व घडामोडींमुळे अस्वस्थ झालेले संभाजीराजे स्वराज्य सोडून औरंगजेबाचा सरदार दिलेरखान यास जाऊन मिळाले. ही चूक पुढे त्यांच्या ध्यानात आली आणि ते पुन्हा स्वराज्यात आले. शिवाजी महाराजांनी त्यांना या कृत्याबद्दल जरी माफ केले तरी स्वराज्य सोडून जाण्यामुळे त्यांच्यात आणि सोयराबाई, अण्णाजी दत्तो आणि इतर मानकर्‍यांमधील दरी अजूनच रुंदावली. अफझलखान, शाहिस्तेखान यांच्यासारख्या बलाढ्य शत्रूंना खडे चारणारे युगपुरुष शिवाजी महाराज घरातील बेबनावापुढे दुर्दैवाने हतबल ठरले.शेवटी ३ एप्रिल १६८० मध्ये आबासाहेब म्हणजेच शिवाजी महाराजही त्यांना कायमचे सोडून गेले आणि डोक्यावर असलेला मायेचा शेवटचा हातही नियतीने शंभूराजांच्या डोक्यावरून काढून घेतला. या युगपुरुषाच्या अंतिम क्षणी सोयराबाईकडून केले गेलेले कटकारस्थान वाचून तर वाचक स्तब्ध होऊन जातो. त्यानंतर संभाजीराजांना पन्हाळगडावर कैद करण्यात आले. पण सरनोबत हंबीरराव मोहित्यांनी सत्य स्थिती आणि स्वराज्याला त्या क्षणी आलेली संभाजीराजांची निकड ओळखली आणि संभाजीराजांची बाजू घेतली. आणि १६ जानेवारी इ.स. १६८१ रोजी संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला.या सर्व सुखदुखांच्या प्रसंगी संभाजींच्या पत्नी येसूबाईनी दिलेल्या साथीचे सुंदर चित्रण या पुस्तकात केले आहे.

औरंगजेबाने इ.स. १६८२ मध्ये मराठ्यांवर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते.जगातील सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला. मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाची कितीतरी उदाहरणे संभाजीराजांच्या कालकीर्दीत झाली .संभाजीराजांनी केलेल्या वेगवेगळ्या स्वाऱ्या , लढायांचे पुस्तकात केलेले जोशपूर्ण वर्णन वाचकास नव्या उमेदीने प्रेरित करतात.

पण संभाजीराजांच्या दुर्दैवाने त्यांचे सख्खे मेहुणे-गणोजी शिर्के काही गावांच्या वतनांसाठी शत्रूला सामील झाले.आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांने केलेल्या संगमेश्वरावराच्या हल्ल्यात संभाजी राजे आपले प्रिय मित्र कवी कुलेश सहित पकडले गेले. आणि त्या क्षणापासून त्या दोघांचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरु झाला. बहादूरगडापासून ते पुढे दोघांच्या मृत्युपर्यंतच्या ४० दिवसांचे अतिशय हृदयद्रावक वर्णन कथन करणारी या पुस्तकातील शेवटची २० पाने वाचताना वाचकाच्या मनात संताप आणि डोळ्यांत अश्रू नकळत तरळून जातात. ही निघ्रुण हत्या मार्च ११, इ.स. १६८९ रोजी भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील आळंदीजवळच्या तुळापूर येथे करण्यात आली.पण इतक्या अत्याचारानंतरही संभाजीराजे औरंगजेबासमोर काडीमात्रही नमले नाहीत आणि यातच औरंजेबाचा पराभव सिद्ध झाला.

अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचा उत्तम जाणकारही होता. संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला.संभाजीराजांचे सल्लागार असलेले कवी कुलेश जरी अनेकांना पटले नसतील तरी या मित्राने मरेपर्यंत संभाजीराजांची साथ सोडली नाही… अगदी भयावह प्रसंगांच्या मालिकेतून असेलेल्या कठीण प्रवासातही. पुस्तक मिटताना "मित्र असावा तर असा " असे नकळत मनात येऊन जाते .

एक दोनच नव्हे तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेना-धुरंदर! मराठ्यांच्या इतिहासात नवा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला. जंजिरेकर सिद्धी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीन लाखाची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब. या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच! विखारी विश्वासघातक्यांची! छावा हे पुस्तक वाचताना शौर्य व साहस यासोबतच उत्तम प्रतिभाशक्तीच्या देणगीने नटलेला असा छत्रपती या महाराष्ट्रास लाभला याबद्दल कृतज्ञता आणि संभाजीराजांबद्दल अतीव आदर या भावनेतच पुस्तकाचे शेवटचे पान उलटले जाईल, यात शंकाच नाही.

- रुपाली ठोंबरे .

1 comment:

  1. जाणत्या राजाचा , सर्जा छावा
    रौद्र रूप तयाचे पाहून मृत्युही भ्यावा

    ऐसा धर्मवीर होने नाही


    http://gauravssonsale.blogspot.in/?m=1

    जरूर वाचा

    ReplyDelete

Blogs I follow :