Monday, March 28, 2016

मनशक्ती...जीवनसाराचा अखंड झरा

" आपली मुले ही उत्क्रांती नियमानुसार हुशार आहेतच पण आपल्याला फक्त हुशार मुलेच हवी का ?" हा प्रश्न मागच्या आठवड्यात खारघर येथे मनशक्ती या केंद्रातर्फे आयोजित केल्या गेलेल्या मेंदुक्रांती या कार्यशाळेमध्ये विचारलेला. आणि उपस्थितीत असलेल्या १ ते ७ वयोगटातील मुलांच्या सर्व पालकांनी एका सूरात 'नाही' असे उत्तर दिले. आश्चर्य वाटले असेल ना ऐकून कि असे कोणते पालक आहेत ज्यांना आपली मुले हुशार नकोत. पण प्रश्न पुन्हा वाचल्यास समजेल कि 'फक्त' या एका शब्दाने उत्तर पूर्णपणे बदलले आहे . तर मग मुले कशी असावीत तर प्रज्ञावान,मेधावी, संस्कारीत, सर्वगुणसंपन्न ,अष्टपैलू असे कितीतरी शब्द त्या सभागृहामध्ये घुमू लागले. प्रत्येक आईवडिलांना हवी असलेली अशी ही मुले कशी निर्माण करता येतील, मुलांच्या विकासाचा आराखडा, भावनांकाचे महत्त्व, उपाय अशा मुलांशी निगडीत विविध विषय या कार्यशाळेत उलगडले, त्यावर चर्चा झाली, विविध दाखले देऊन काही अंशी पालक कसे चूक असतात तेही समजावून देण्यात आले. पालकत्त्वाच्या नेमक्या भूमिकेचं उत्तम विश्लेषण ऐकून दिवस सत्मार्गी गेला असेच वाटले शेवटी.

काही दिवसांपूर्वीच एका शालेय मित्राकडून समजलेली ही कार्यशाळा. तसे पहिले तर यापूर्वीही लोणावळा येथे मनशक्तीने आयोजित केलेले १-२ वर्ग केले होते म्हणून आणि कार्यशाळेचा विषय यांमुळे यात नेमके काय असेल याची कल्पना होतीच.पण येताना १०% जरी उपयोग झाला तरी वेळ मार्गी लागेल असा विचार करणारे आम्ही जाता जाता इतके काही घेऊन जाऊ असे वाटले नव्हते. प्रत्येक पालकाने ग्रहण करावी अशी चांगल्या विचारांची शिदोरी घेऊन आम्ही घरी आलो होतो.

आजच्या जगात जिथे फक्त मुलांच्या बौद्धिक विकासाला महत्व दिले जाते तिथे भावनिक, शारीरिक आणि मानसिक विकास किती महत्त्वाचा आहे हे मनापासून पटले. या स्पर्धामयी जगात वावरताना वाढत असलेल्या स्पर्धेचे बहाणे देत अपेक्षांचे भले मोठे ओझे त्या इवल्या पंखांवर लादताना प्रत्येकाने एकदा स्वतःलाच विचारावे " नक्की स्पर्धा कोणामध्ये ?…. मुलामुलांमध्ये कि पालकापालकांमध्ये." अनेक पालकांच्या समस्यांमध्ये मुलांमध्ये असलेल्या भीती आणि राग या दोन दुर्गुणांचा कायम उल्लेख. हे दोन्ही गुण कायम संपुष्टात येत नाहीत तर त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत… भीतीला धैर्याची जोड देऊन तर रागाला शांतीची जोड देऊन . असे कितीतरी चांगले विचार आणि त्याचे पटण्याजोगे विश्लेषण या मनशक्तीच्या कार्यशाळेत अनुभवले.

"मनशक्ती" , संस्थापक 'विज्ञानानंदानी मांडलेल्या 'न्यू वे ' तत्त्वज्ञानातून जन्मास आलेली प्रयोगशाळा जिथे न्यूटोनियन मेकॅनिक्सपासून क्वॉन्टम् आणि इपीआर पॅराडॉक्सपर्यंत, जीवशास्त्र, मानसशास्त्र, सूक्ष्म मानसशास्त्र, पदार्थ विज्ञानशास्त्र, शिक्षणशास्त्र, तर्क, गणित इत्यादी एकूण २८ विज्ञान शाखांच्या आधारावर प्रयोग केले गेले. गर्भसंस्कार, बालसमस्या , मत्सरघातमुक्ती, कुटुंबसंवर्धन अशा अनेक विषयांवर आधारित अभ्यासवर्ग, कार्यशाळा, पुस्तके यांचा अर्थपूर्ण आणि या वैज्ञानिक जगातही मनाला पटणार असा अलौकिक नजराणा … या राष्ट्राच्या कल्याणासाठी.कारण आजची पिढी ही जरी तुमची मुले असतील तरी ही संपत्ती आहे राष्ट्राची… उद्याच्या भारताच्या भावी विकासाची, असे मानणारी एक निस्वार्थ संस्था.

पुणे-मुंबई महामार्गावर प्रवास करणाऱ्या बहुतेक जणांना या केंद्राबद्दल माहित असेलच कारण ' मनशक्ती' केंद्र हे मुंबई -पुणे एक्स्प्रेस हायवेवरच आहे. पण तिथल्या ज्ञानाच्या प्रकाशापेक्षा तिथे मिळणाऱ्या जेवणाची चव येणाऱ्या जाणाऱ्या पांथस्थांमध्ये अधिक प्रिय आहे. पण जरा २ पावले पुढे आलो तर तिथे वाहणारा जीवनास उपयुक्त असा ज्ञानाचा झरा दृष्टीस पडेल ज्यात प्राशन करता येण्यासारखे बरेच काही आहे…'जीवनाचे सार' म्हटले तरी अयोग्य नाही.


- रुपाली ठोंबरे .

No comments:

Post a Comment

Blogs I follow :