Wednesday, April 27, 2016

जुन्या गोड क्षणांतुन डोकावणारा गोडवा

संध्याकाळची वेळ. मी घरी एकटीच. बराच वेळ कॉम्प्युटरवर वेगवेगळी बटणे दाबत माझा निरर्थक टाईमपास सुरु होता. उगाचच नेटवरच्या बातम्या वाचणे , फेसबूक वरच्या मित्र मैत्रिणींची सध्याची प्रगती पाहणे , मध्येच स्वतःचेच प्रोफाईल उघडून स्वतःचेच फोटो नव्या उत्सुकतेने पाहणे असे अनेक उद्योग करत खरेतर आता कंटाळवाणे वाटू लागले होते. डोळ्यांसमोरची स्क्रीन सतत बदलत होती. पण कोपऱ्यामध्ये मघापासून उघडलेली एक छोटेखानी चाट विंडो अजून तशीच होती. राहवले नाही कि मीच अधूनमधून त्या हव्या हव्याशा संभाषणाची सुरुवात नव्याने करण्याचा प्रयत्न करत होते.

                    " Hey Hi !"
                    " Hi "
                    " Hello, r u there ?
                    " Kuthe aahes ata ? nighalas ka officemadhun ?
                    " kiti vajtil ghari pohochayla ?"
                    " Please reply…"

अशा कितीतरी लहानमोठया वाक्यांनी त्या छोटया जागेत सामावलेले ते एकपात्री संभाषण पुढे सरकत होते. पण तरी एखादया अनुस्वाराइतकाही प्रतिसाद समोरून येऊ नये. न राहवून पुन्हा पुन्हा status पाहत होते पण तिथेही तो हिरवा रंग कायम. मग शंका अजून चलबिचल होई.

शेवटी कॉम्प्युटरचा ध्यास सोडून मी मघापासून दुर्लक्षित असलेल्या मोबाईलकडे आपला मोर्चा वळवला. आज सर्वात अधिक प्रिय असलेल्या whatsapp वरचे messages पुन्हा पुन्हा वाचले , पुन्हा त्याच एकपात्री संभाषणाची पुनरावृत्ती इथेही झाली. पण परिणाम तोच… NO  REPLY. प्रत्येक प्रश्नानंतर शेवटच्या २ रेघा निळ्या होण्याची मी अगदी आतुरतेने वाट पाहत होते. पण त्या तशाच रंगहीन राहिल्या आणि माझे प्रश्नही अनुत्तरीत. गेल्या कित्येक दिवसांपासून LAST VISIT मध्ये ती एकच तारीख पाहून मन बचैन होई.

इतक्यात दारावरची घंटी वाजली आणि प्राणात प्राण आले. तशीच धावत जाऊन मी मोठ्या आशेने दरवाजा उघडला आणि समोर एका अनोळखी व्यक्तीला पाहून भ्रमनिरास झाला.

                " ताई , तुमचे पार्सल आले आहे "

मी काहीशा जड मनानेच थरथरत्या हाताने सही करत ते हाती घेतले. तो " Thank You !" म्हणत लगेच निघूनही गेला पण मी मात्र अजूनही तिथेच स्तब्ध उभी होते. कुणाची तरी वाट पाहत. पण समोर होता फक्त शेजारच्यांचा तो मुग्ध उभा स्तब्ध दरवाजा…. माझ्याकडे निर्विकारी नजरेने पाहत. फुलाफुलांचे केशरी तोरणही आता कोमेजल्या चेहऱ्याने हसण्याचा प्रयत्न करत होते. कोपऱ्यात दिसणाऱ्या जिन्याची सुरूवात काही केल्या हवे ते दाखवत नव्हती म्हणून उगाचच त्याच्यावर रागावून मी दार लावून आत वळले.

आणि माझ्या उजवीकडे पहाते तर काय ? मघापासून ज्याच्या वाटेकडे डोळे लावून तळमळत होते तो हा इथे भिंतीला पाठ टेकवून उभा. मी तसेच पार्सल बाजूला ठेवून त्याच्याकडे धावले.

              " अरे , तू कधी आलास?"
             " माहित आहे मी किती वाट पाहत होते ?"
            " होतास कुठे इतका वेळ…. न फोन न मेसेज…नेटवरही ऑनलाईन असून एक साधा रिप्लाय केला     नाहीस तू . का? रागावलास ?

पण पुन्हा तेच. एकाही प्रश्नाला उत्तर नाही. मुखाने उत्तर सोडाच साधा एक भाव नाही चेहऱ्यावर. तो तसाच समोर माझ्याकडे एकटक पहात… एक ओळखीचे अगदी हवेहवेसे स्मित घेऊन.

मी आणखी पुढे सरसावले. त्याच्या डोळ्यांत आज मला मी दिसत नव्हते. पण त्याच्या सर्वांगावर पडलेले माझे प्रतिबिंब आता मलाच अस्वस्थ करत होते. नजर जरा खालच्या दिशेला गेली आणि क्षणभरासाठी मीच गिफ्ट केलेला शर्ट पाहून त्या क्षणीही सुखावले. पण हळूहळू बरेच काही ध्यानात येऊ लागले. सकाळीच फोटोवर चढवलेल्या हारातील मोगरा आता बरेच काही सांगत होता. सभोवतालच्या वस्तू , तिथला कोपरा न कोपरा आता मला भानावर आणत होता. आठवणींचे असंख्य कुंचले एकाच क्षणी मनात खूप काही रेखाटत होते…समोरच्या काचेमध्ये ओघळणाऱ्या आसवांमध्ये पूर्वीचे आठवणारे आनंदाचे रंग नकळत मिसळून जात एक स्मित हळूच डोकावत होते. 

खरेच आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असा दुरावा निश्चितच कधीतरी येणारच असतो मग तो पती /पत्नीपासून असेल किंवा आईवडिलांपासून असेल किंवा आणखी कोणीही जो आपल्याला अधिक प्रिय आहे. त्यावेळी होणाऱ्या वेदना या इतर कोणत्याही यातनांपेक्षा खरेच खूप कठीण असतात. तेव्हा गत आठवणींसोबतच आणखी काही त्रासदायक असेल तर ते म्हणजे…. मनास राहून गेलेल्या गोष्टींची वाटणारी खंत. ' अरे हे करायचे राहूनच गेले ','मी असे करायला नको होते ', 'इतके दुर्लक्ष नको होते ', 'मी पुढच्या वेळी असे करणारच होतो पण त्याआधीच अपरिचित घडले ','मी वेळ द्यायला हवा होता ' …. अशा असंख्य चुकांची जाणीव कित्येकदा एखादी व्यक्ती हरवल्यानंतरच होते. त्या क्षणी उगाचच अपराधी असल्यासारखे वाटत राहते. म्हणूनच प्रत्येकाने सध्या आपल्यापाशी जे जे आहे त्याची योग्य किंमत जाणली पाहिजे. आईवडील,सहचारी असो वा आणखी कोणीही, जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत जे जे शक्य असेल ते ते सर्व करण्याचा प्रयत्न करायला हवा. नात्यांमध्ये 'पुढे करू' हे धोरण कमी अवलंबलेलेच बरे.फेसबूक, whatsapp सारख्या सोशल मिडियावर गरजेपेक्षा जास्त वेळेचा अपव्यय करण्यापेक्षा जे सोबत आहे त्यांच्यावर या वेळेची लयलूट करणे हा सुखाचा एक खरा मार्ग . कारण माणूस आज आहे आणि उद्या नाही.खरेतर प्रियजनांच्या तसबिरीवरचा हार फुलांचा असो व चंदनाचा तो कोणालाही आवडत नाही. क्षणात त्याला दूर करावेसे वाटते. पण त्यातून साध्य काहीच होणार नाही. त्यामुळेच आजचे क्षण पूर्णपणे स्वतःसाठी आणि प्रियजनांसाठी जगा म्हणजे सोबतीचे क्षण पूर्णपणे आनंदात घालवलेले असतील तर नंतर जेव्हा अशी एकाकी वेळ येईल तेव्हा खंत न वाटता त्या जुन्या गोड क्षणांतुनही एक नवा गोडवा पुन्हा आयुष्यात येईल….पुढे जगण्यासाठी चेहऱ्यावर हवी असलेली एक स्मितरेषा घेऊन .

 - रुपाली ठोंबरे.


3 comments:

  1. रुपाली तुझा हा लेख हृदयाला असा काही स्पर्श करून जातो कि क्षणभर माझ्यासमोर सुद्धा माझा भूतकाळ आणि त्यातले काही क्षण उभे राहिले .. खूप छान लिहिलं आहे ...

    ReplyDelete
  2. Masst ga. Kharach dolyasamor ubha rahila sagla...chhan

    ReplyDelete
  3. छानच.... शब्दानी अक्षरश: चित्रफ़ित दाखवली

    ReplyDelete

Blogs I follow :