Monday, April 4, 2016

रुईचीही वाटतात जड मला ओझी

माणसाचा एक गुणधर्मच आहे कि त्याला नेहमीच स्वतःचे दुःख पहाडा एवढे आणि दुसऱ्याचे वाळूच्या सूक्ष्म कणाइतके सूक्ष्म वाटते. आणि सुखाच्या बाबतीत याच्या एकदम उलट असते. कधी कधी यातूनच ईर्ष्या जन्म घेते तर कधी निराशा. या दोन्ही भावना मानवासाठी हानिकारकच. कधीकधी अगदी क्षुल्लक कारण असते पण त्याचे तो स्वतः मनावर इतके ओझे घेतो की हकिकतेत असलेल्या सामान्य संकटाचाही खूप मोठा बाऊ करून घेतो. आणि तेच मानसिक ओझे सांभाळत आणखी खचत जातो. इतरांची प्रगती कधीकधी नकोशी वाटते. इतरांपासून काही शिकण्यापेक्षा तो त्यांचा तिरस्कार करणे पसंत करतो. पण अशा प्रकारे स्वतःची दयनीय स्थिती करून घेत असताना शेवटी तो पार कोलमडून जातो आणि त्यातच अंत होतो. पण यातूनच चांगला धडा घेऊन , इतरांकडून प्रेरणा घेऊन आयुष्याचा पाठ नव्याने गिरवण्यास सुरुवात केली तर नक्कीच यश आपल्यालाही आपलेसे करून घेईल आणि आपणही इतरांसाठी प्रेरणास्थान ठरू शकू यात शंकाच नाही.



घेऊन टोपलीभर डोईवर ओझे
चालतो समजून हे नशीबच माझे

काठोकाठ भरलेली टोपली माझी
रुईचीही वाटतात आता जड मला ओझी

नशिबाला दोष देत रडतच होतो उभा मी
पुढे जावेसेच न वाटे, शेवटी थांबलो तिथेच मी

रस्त्यावर त्या, भेटले माझ्यासारखेच कितीतरी जण
त्यांच्या डोईवरचे ओझे वाटे माझ्यापेक्षा कमीच पण

दुरून पाहिले तर एकाची टोपलीच दिसे रिकामी
जवळ जाऊन पाहिले तर त्यात दगड होते फक्त काही

वजनाचा अंदाज घेतलाच नाही मी
आणि झालो आणखीनच दुःखी मी

 फार जवळ येता त्याच्याही डोळ्यांत दिसले मला पाणी
 कुत्सिततेने म्हटले त्याला मी,

" अरे, अर्धे टोपले रिकामेच तुझे
   बघ किती सारे ओझे हे माझे
   मी रडतो त्याला कारण आहे खरे
   तुझ्या अश्रूंची कथा काय आहे बरे ?"

पाणेरी डोळ्यांसवे हसतच म्हणू लागला तो

" रे सवंगड्या, यशाच्या आनंदाचे अश्रू हे आहेत सारे
  नशिबाचीच कमाल मित्रा, सदा वाहतात सुखांचे वारे
  दगडांचे ओझे घेऊन चालत आलो मी आज इथवर
  त्याच दगडांचे प्रसंगी सेतू बांधले मी येत्या संकटांवर
  आनंदाने स्वीकारत गेलो सामोरी आले जेही काही
  दुःखाची काळी सावली कधी मला जाणवलीच नाही  "

हसत-हसतच तो निघून गेला तिथून
मी मात्र त्याचा हेवा करत तिथेच होतो थांबून

इतक्यात काय झाले ?
दूर उंच निळ्या आकाशातून
चिमणी आली माझ्यापाशी भुर्रकन उडून

बांधत होती ती एक घरटे इवल्याशा पिल्लांसाठी
कापूस मागत होती मला मऊ -मऊ गादीसाठी

स्वतःतच हरवलेलो मी, भानच नव्हते माझे मुळी तिच्यापाशी
ओझे दूर करण्याची एकेक संधी स्वार्थापायी गमावत गेलो मी ही अशी

तेव्हाच समोरून आला एक नवा पाहुणा
घेवून डोईवर गुलाबफुलांचा सुंदर नजराणा

पाहून त्याला हिरमुसलो अजूनच मी आता पुन्हा
वाटू लागले "का इतकी शिक्षा मलाच, काय केला मी गुन्हा ?"

परी लाल फुलांआड लपलेले काटे मला दिसलेच नाहीत
रक्ताळलेले हात आणि गोठलेले रक्त मला दिसले नाहीच

पुन्हा स्वतःच्याच नशिबाला दोष देत होतो मी तिथेच उभा
एका चमत्काराची प्रतीक्षा करत जिथे मिळेल काही मुभा

तीच चिमणी भिरभिरत आली आणि घेऊन गेली फूलपाकळ्या
आणि काटे नकळतच दूर गेले, खुलू लागल्या आनंद कळ्या

हसत-हसतच ते दोघे निघून गेले तिथून
मी मात्र त्यांचा हेवा करत तिथेच होतो थांबून

अचानकच आकाशात जमू लागले मेघ काळेसावळे
निराशेच्या भावनांनी मना वेध लागले भलते आगळे

इतक्यात काय झाले ?
दूर उंच निळ्या आकाशातून
झरू लागल्या सरी मागून सरी ओथंबून

स्वतःतच हरवलेलो मी, भानच नव्हते माझे मुळी त्यांच्यापाशी
वाढलेले ओझे पुन्हा कवटाळून घेत एकेक ओझी वाहवत गेलो मी ही अशी

क्षमतेच्या पलीकडे गेले जेव्हा सारे
कोलमडून पडलो खाली, उरले फक्त सर्वत्र निखारेच निखारे



- रुपाली ठोंबरे . 

1 comment:

Blogs I follow :